Tuesday 22 September 2015

गॉड ऑफ स्मॉल थिंग्झ

https://critperspective.files.wordpress.com/2011/12/the-god-of-small-things1.jpg
सामान्यत: आपण आपल्याला ज्या लेखकांचे विचार पटतात अशा लेखकांची (लेखक हा शब्द स्त्री आणि पुरूष लेखक या दोघांसाठी एकच वापरला आहे) पुस्तके वाचतो. ज्यांचे लेखन अधिक भावते अशांची पुस्तके अधिकाधिक वाचली जातात. माझ्या आयुष्यातील एक काळ असा होता की मी फक्त विशीष्ट प्रकारचीच पुस्तके वाचत होते. अचानक १२-१३ वर्षांपूर्वी असे जाणवले की आपण विविधांगी वाचायला पाहिजे. म्हणजे जे लेखक फारसे माहिती नाहीत त्यांची पुस्तके देखील वाचली पाहिजेत. त्याचप्रमाणे विविध विषयांवरील लेखन कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता वाचली पाहिजेत. गेल्या १२-१३ वर्षांत खूप विविध प्रकारचे, विविध विषयांवरचे लेखन वाचनात आले. शक्यतो वाचन करताना मी कोणताही राजकीय दृष्टिकोन ठेवत नाही. त्यामुळे वाचनात केवळ उजव्या विचार सरणीच्याच लेखकांचे वाचायचे आणि डाव्या विचारसरणीचे नाही असल्या भानगडी ठेवत नाही. कोणतंही पुस्तक वाचून झाल्यावर आपली सारासार विचार करण्याची शक्ती वापरून त्या पुस्तकाचं विश्लेषण करायचं हे ठरलेलं. हेच धोरण मी चित्रपट पाहताना ठेवते. त्यामुळे जसे मी कोणतेही पुस्तक वाचू शकते तसाच कोणताही चित्रपट पाहू शकते.

तसं अरुंधती रॉय हे नाव तिच्या "गॉड ऑफ स्मॉल थिंग्झ" या पहिल्याच (आणि शेवटच्याही म्हणू शकतो) कादंबरीला जगप्रसिद्ध आणि मानाचा बुकर पुरस्कार मिळाला तेव्हाच ऐकलं. त्यानंतर ही बाई ज्या ज्यावेळी राजकारणावर किंवा इतर गोष्टींवर बोलली, काही बाही लिहीलं त्यावेळी खरंच सांगते ती माझ्या डोक्यात गेली. म्हणून आत्ता आत्तापर्यंत मी तिचं ते "गॉड ऑफ स्मॉल थिंग्झ" कधीच वाचलं नव्हतं.....घरात पडलेलं होतं. साधारण पंधरा दिवसांपूर्वी मला माझ्या नवर्‍याने त्या पुस्तकाचं अपर्णा वेलणकर यांनी भाषांतर केलेलं मराठी पुस्तक भेट दिलं. माझ्या कपाळावरची आठी पाहून तो मला म्हणाला की अगं एक कथा म्हणून वाचून पहा. आणि मी ती वाचायला घेतली. ४४० पानांची भरगच्च कादंबरी एकदा हातात घेतली की सोडवत नाही. सध्या प्रचलित असलेला मधेच वर्तमान, मधेच भूतकाळ, मधेच त्यातील उप-उप कथानकं.....अशा स्टाईलमधे लिहीलेली असली तरी कथेचा गाभा कुठे सुटलाय असं आजीबात वाटत नाही. अधिकाधिक लेखक सुरुवातीला किंवा पुढे देखील आपल्या प्रत्यक्ष आयुष्यातील अनुभव आणि पाहिलेली पात्रेच आपल्या लेखनात वापरतात. सुरूवातीलाच दिलेली अरुंधती रॉय यांची ओळख वाचल्यानंतर "गॉड ऑफ......" वाचताना सारखं असं वाटत रहातं की कथेचा अधिकांश भाग हा त्यांच्या आत्मकथनाचा आहे काय? असो.

लहान मुलांचं भावविश्व....(विशेषत: जुळयांचं भावविश्व) आणि त्यांच्यावर होणारा आजूबाजूच्या छोट्या छोट्या गोष्टींचा, प्रसंगांचा कायमस्वरूपी परिणाम हे या कादंबरीत प्रकर्षानं येतं. कथा छोटीशीच आहे पण ज्या प्रकारे ती रंगवली आहे त्याला तोड नाही. वर्तमान आणि भूतकाळांच्या कथानकं, उप कथानकं, उप-उप कथानकं यांचं अतिशय दाट जाळं विणलेलं असलं तरी कथेचा क्लायमॅक्स हा शेवटच्या काही पानांमधेच उलगडत जातो. पहिल्यापासून आपल्याला जो प्रश्न पडलेला असतो की या कादंबरीचं नाव "गॉड ऑफ स्मॉल थिंग्झ" का ठेवलंय याचं उत्तरही शेवटीच मिळतं. भाषा बरीच अश्लील आहे आणि अनेक प्रसंगांचे उत्तान वर्णन असले तरी कादंबरीच्या कथानकाला साजेसेच आहे. त्यामुळे त्यावरुन कादंबरी वाचूच नये असे मात्र ठरवू नये. मानवी अस्तित्व, नात्यांची भावनिक गुंतागुंत, सामजिक रूढी-परंपरा यात अडकलेलं मानवी जीवन, मानवी जीवनाचा मूळ हेतू, अश्रु, भय, दु:ख, तिरस्कार यासगळ्यांनी दाट विणलेले भावनिक, धार्मिक आणि सामाजिक पदर.....यातून दर्शन होते गॉड ऑफ स्मॉल थिंग्झ चं.  कादंबरी एक एक करत विविध भावनिक, धार्मिक, सामाजिक पदर उलगडत जाते. शेवट वाचताना डोळ्यात पाणी उभं रहातं हे नक्की.

मुलांचं भावविश्व आपण मोठ्यांनीच जपलं पाहिजे. त्यांच्याशी कुठे वाईट वर्तन होत नाहीये ना याची खात्री करून घेतली पाहिजे. मुलांमधे आणि आई-वडिलांमधे इतकं मायेचं आणि मित्रत्त्वाचं नातं असलं पाहिजे, विश्वासाचं नातं असलं पाहिजे की काहीही झालं तरी ते त्यांना आई-वडिलांना सांगता आलं पाहिजे. अजुन खूप काही आहे पण ती कादंबरी एकदा तरी जरूर वाचा इतकंच सुचवेन.

Tuesday 11 August 2015

पीएचडी - अपेक्षा आणि वास्तव (भाग २) : पीएचडी गाईड

 पीएचडी - अपेक्षा आणि वास्तव (भाग १) : प्रस्तावना
पीएचडी चे गाईड ही एक अशी व्यक्ती असते की जिच्यामुळे त्या पीएचडी विद्यार्थ्याचं आयुष्य एकतर एकदम सुकर होतं किंवा अतिशय वाईट/अवघड होतं. पीएचडी गाईडचा रोल म्हणजे विद्यार्थी योग्य मार्गावरून जातो आहे की नाही हे पहाणे आणि गरज लागल्यास योग्य तो मार्ग दाखवणे असा असतो. पण प्रत्यक्षात परिस्थीती विविध प्रकारांनी नटलेली असते. ह्यावेळी मला जसपाल भट्टींची एक मालिका आठवते आहे की ज्यामधे एक पीएचडीचा विद्यार्थी त्या गाईडची सगळी वैयक्तिक कामं करत असतो (स्वत:च्या पीएचडीच्या अभ्यासाशिवाय). आपल्या राजधानीतील एका सुप्रसिद्ध विद्यापीठात अशा पद्धतीने पीएचडी करणारे बरेच विद्यार्थी पाहिल्याचे अनेक लोकांनी सांगीतले. काहीवेळा विद्यार्थी काहीही काम करत नाही आणि बहुतांश काम हे त्यांचे गाईडच करून देतात. अशा दोन केसेस मी ऐकल्या आहेत की ज्यांच्या गाईडने त्या त्या विद्यार्थ्याने केलेलं काम स्वत:च्या नावावर (विद्यार्थ्याचं नाव पेपरमधे न घालता) प्रसिद्ध केलें आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्याला काहीच क्रेडीट मिळालं नाही. नविन प्रश्नावर सगळं नविन काम पुन्हा पहिल्यापासून करावं लागलं. काही केसेस मधे गाईडला काहीच येत नसतं आणि विद्यार्थीच मूळात हुशार असतो आणि सगळं निभावून नेतो. ह्यात कुठेही अतिशयोक्ती नाही....हे वास्तव आहे. बहुतांश पीएचडी गाईड्सची अपेक्षा अशी असते की मी जे सांगतो तेच करायचं बाकी काही करायचं नाही. पण यातून पीएचडीचा मूळ हेतूच साध्य होत नाही. कारण पीएचडी करण्यामागचा मूळ हेतू हा त्या विद्यार्थ्याला एक स्वतंत्र संशोधक बनण्याचे ट्रेनींग/अनुभव मिळणे हा आहे. एखाद्या विषयाचा ब्रेड्थ आणि डेप्थने  शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास कसा करायचा हे शिकणे आणि हे शिकताना एखाद्या प्रश्नाची आधी कधीच न मांडलेली उकल शोधून काढणे म्हणजे पीएचडी करणे. आता जर सगळंच गाईड सांगणार असेल तर विद्यार्थी स्वतंत्रपणे विचार करायला कधी शिकणार?

अनेकवेळा गाईड विद्यार्थ्याला मुद्दाम गोंधळात टाकण्यासाठी सरळ सरळ काहीच बोलत नाहीत. आजच्या मिटींगमधे जी चर्चा झाली असेल त्याचा दुसर्‍या दिवशीच्या मिटींगमधील चर्चेशी काहीही संबंध नसणे, आधीच्या मिटींग मधील ठरवलेल्या गोष्टी विसरणे आणि त्यामुळे पुढच्या मिटींगमधे सुद्धा गाडी फारशी पुढे जातच नाही. पीएचडी गाईड आणि पीएचडीचा विद्यार्थी यांचे सुर जुळणे हे खूप महत्त्वाचे असते आणि असे जुळलेले सुर खूप कमी पहायला मिळतात. गाईड हा प्रकार विद्यापीठ ठरवतं. प्रत्येक विद्यापीठाच्या पीएचडी संशोधन करण्यासाठी आणि ते मांडण्यासाठी काही विशिष्ट पद्धती असतात. त्या पद्धतींप्रमाणे सगळं चालू आहे ना, होत आहे ना हे पाहण्यासाठी विद्यापीठाने गाईड दिलेला असतो. त्याच बरोबर गाईडला त्या विषयातील आपले ज्ञान वाढविण्याची, आपली संशोधन क्षमता वापरण्याची संधी मिळते. गाईड जर वयाने तरूण आणि फारसा अनुभवी नसेल तर त्याचेही फायदे आणि तोटे असतात.

गाईड वयाने तरूण असण्याचे फायदे असे की विद्यार्थ्याला कामाची पूर्ण मोकळीक मिळते (ईगो ईश्यू फारसा येत नाही), पीएचडीचे काम लवकर संपण्याची खात्री देता येते (कारण जितक्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन कराल तितका तुमचा अ‍ॅकॅडमीक्स मधे वकुब वाढतो) पण विद्यार्थ्याला संशोधनाविषयी फारशी माहिती नसेल तर मात्र त्या विद्यार्थ्याचा बोर्‍या वाजू शकतो, संशोधनाचा, पीएचडीचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा फारसा अनुभव नसल्याने अशा तरूण, अननुभवी गाईडचा विद्यार्थ्याला फारसा उपयोग होत नाही. त्यांचे संशोधन वर्तुळात फारसे कॉन्टॅट्क्स नसतात. त्यामुळे पीएचडी मिळाल्यावर पुढे रिसर्च पोझीशन मिळवणे किंवा पोस्ट-डॉकला त्यांचा फारसा उपयोग होत नसतो.
गाईड रिसर्च फंडींग मिळविण्यात माहिर असावा लागतो. फंडींग असेल तरच संशोधन होऊ शकतं त्यामुळे कॉन्टॅक्ट्स असणं हे फार महत्त्वाचं की जे तरूण, अननुभवी गाईडला क्वचित जमतं. बर्‍याचवेळी हे गाईड लोक स्वत:कडे फंडींग असेल तर विद्यार्थ्याचा विचार न करता स्वत:ला हवा तितका वेळ संशोधनाचं काम करण्यासाठी घेतात. त्यावेळी त्यांना वेळीची फिकीर नसते. विद्यार्थ्याला सांगत राहतात की तुम्ही पीएचडीला किती वेळ घेतला हे महत्त्वाचं नाही तर काय काम केलं हे महत्त्वाचं. कामाची क्वालीटी महत्त्वाची आहेच पण तुम्हाला लागणारा वेळ देखील महत्त्वाचा आहे. क्वलीटीचं काम जास्तीत जास्त कॉन्फरन्स आणि जर्नल्स पब्लीशींग केलेलं असेल तर जास्त वेळ लागला तरी हरकत नाही. पण यापैकी काहीही न होता तुमच्या पीएचडीला वेळ लागला असेल तर ते सगळं तुमच्या रिझ्युमे मधे रिफ्लेक्ट होतं. जर एखाद्या गाईड कडचं फंडींग संपत आलेलं असेल किंवा त्याला तो विद्यार्थी नको असेल तर असे गाईड लोक त्यांच्या विद्यार्थ्यांना तुझी पीएचडी लगेच संपव आणि आता पुढच्या सहा महिन्यात तुला थिसीस सबमीट करावा लागेल असं म्हणून मागे लागतात.
यासारख्या अनेक कारणांमुळे पीएचडी गाईडचा रोल पीएचडी करण्यात महत्त्वाचा होऊन बसतो. ९५% गाईड्स ना आपल्याकडे येणार्‍या विद्यार्थ्यांनी आपण जे सांगू तेच करावं अशी अपेक्षा असते कारण त्यांच्याकडे विशिष्ट संशोधनासाठी फंडींग असतं, त्यांना संशोधनाचा अधिक अनुभव असतो आणि येणार्‍या विद्यार्थ्याला संशोधनाविषयी फारसं माहित नसण्याचीच शक्यता ९९% असते. त्यामुळे गाईड्स ने हे गृहीत धरलेलं असतं की पीएचडीचा विद्यार्थ्यी त्यांच्या आज्ञेबाहेर नसणार. इथेच खूप मोठी गोची होते. जर गाईड समजुतदार असेल तर विद्यार्थ्याच्या फायद्यासाठी विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे विचार करण्याची मुभा दिली जाते आणि आवश्यक तिथेच गायडन्स दिला जातो. पण जिथे एखाद्या विद्यार्थ्याला संशोधन काय करायचंय आणि स्वतंत्रपणे स्वत:चा विचार करण्याची सवय असेल तर मात्रं गाईडशी बेबनाव होऊ शकतो. आणि मग त्या विद्यार्थ्याचे हाल कुत्रं खाणार नाही असे होतात. त्यामुळे शक्यतो सुवर्ण मध्य गाठण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे पूर्णपणे गाईड जे सांगेल त्यावरच अवलंबुन न राहता, स्वत: स्वतंत्रपणे काम आणि विचार करायचा पण गाईडला असं भासवायचं की आपण सगळं त्यांच्या संमतीनेच करतो आहोत. खूप जोखमीची गोष्ट असते ही. त्यामुळे ९६% विद्यार्थी गाईड जे सांगेल तेच आणि फक्त तेच करतात. त्यामुळे पीएचडीच्या प्रत्येक तोंडी परीक्षेत, प्रेझेंटेशन मधे अशा विद्यार्थ्यांचे गाईड्सच उत्तरं देतात. त्याचा परिणाम असा देखील होऊ शकतो की ती व्यक्ती पीएचडी नंतर सुद्धा गाईडवरच पूर्णपणे अवलंबुन राहते.  यामुळे पीएचडी गाईड आणि त्यांचा विद्यार्थी यामध्ये काहीवेळा गुरू-शिष्य, देव-भक्त यासारखे नाते तयार होताना दिसते की जे विद्यार्थ्याच्या स्वतंत्र संशोधक बनण्यास मारक ठरते. काहीवेळा गाईड वयस्कर असतील त्यामुळे देखील अडचणी येतात कारण ते त्या विषयाशी अपडेटेड नसू शकतात. काहीवेळा गाईडचा विषय पूर्णपणे वेगळा असतो आणि त्यांना विद्यार्थ्याच्या विषयाशी काहीही देणेघेणे नसते. त्यावेळी सुद्धा अडचणी येऊ शकतात.

या अडचणींवर मात करण्याचा एक उपाय असतो तो म्हणजे पिअर-रिव्ह्युड (आपल्या क्षेत्रातील इतर व्यक्तींनी वाचून मान्यता दिलेले) कॉन्फरन्सेस आणि जर्नल्स मधे आपले संशोधन पेपरच्या स्वरूपात पब्लीश करणं. पेपर पब्लीशींग हा खूप महत्त्वाचा आणि मोठा विषय असल्याने तो मी स्वतंत्रपणेच लिहीणार आहे. काही गाईड्स स्वत:च आपल्या विद्यार्थ्याच्या नावाने पेपर्स लिहीतात आणि पब्लीश करतात. काही गाईड्स कुठलंच योगदान न देता नुसतंच आपल्या विद्यार्थ्याच्या पब्लीशींग मधे स्वत:चं नाव घालतात. काही जण पूर्ण तयार झालेला पेपर वाचतात आणि ठरवतात की आपलं नाव त्यात घालायचं की नाही. गाईड लोकांची भाषा देखील विद्यार्थ्यांना कळायला वेळ लागतो. एखाद्या विद्यार्थ्याला एखादी गोष्ट ताबडतोब सबमीट करायला सांगणं याचा अर्थ "तू हे कालच करायला हवं होतंस" असा असतो तर गाईड स्वत: एखादी गोष्ट ताबडतोब करेन असं म्हणतो त्यावेळी "त्याला जितका हवा तितका वेळ तो घेणार" असा अर्थ असतो.
शक्य असल्यास पीएचडी गाईडशी पंगा न घेताच काम करावं. पण पीएचडी गाईड ही एक अशी व्यक्ती असते की जिच्याशी मैत्रीत राहून देखील चार हात दूर रहावं.

Monday 11 May 2015

पीएचडी - अपेक्षा आणि वास्तव (भाग १) : प्रस्तावना

http://thegradstudentway.com/blog/wp-content/uploads/2012/12/PhD-Degree.jpg

पुणे विद्यापीठात शिकत असताना सर्वप्रथम पीएचडी या पदवीशी संबंध आला. पण त्याविषयी फारसं काहीच माहिती नव्हतं.  एमएस्सी झाल्यावर तिथल्याच एका सरांनी इथे पीचडी करणार का असा प्रश्न विचारला. तोपर्यंत पीएचडीचा संबंध नविन संशोधनाशी असतो हे माहिती झालेलं होतं. पण आमच्या डिपार्टमेंटमधलं एकूण वातावरण पाहता आणि संशोधनासाठी स्वत:ला एखादा प्रश्न पडला पाहिजे व तोच प्रश्न सोडविण्यासाठी आपण संशोधन करायला पाहिजे असा समज कुठेतरी निर्माण झाला होता. म्हणजे गाईडने दिलेला प्रॉब्लेम सोडवणं हे तेव्हा देखील मला मंजुर नव्हतं. 

थोडक्यात संशोधन खर्‍या अर्थाने करण्यासाठी स्वत:ला अनुभव पाहिजे आणि अनुभवाअंती आपल्याला एखादा प्रश्न पडलेला असेल तर त्याचं उत्तर शोधून काढण्यासाठीच पीएचडी करायचं असं मी ठरवुनच टाकलेलं होतं. खरं तर संशोधनामागचा उद्देशही तोच पाहिजे. पण सध्याच्या टोकाच्या व्यावसायिक स्पर्धेत प्रश्नाची उकल करण्यासाठी संशोधन आणि संशोधन केलं म्हणून पीएचडी असं न राहता, व्यावसायिक चढण चढण्यासाठी पीएचडी करणे, नावामागे डॉ लावलं की प्रतिष्ठा वाटते म्हणून पीएचडी करणे, टीचींग जॉबसाठी चांगलं म्हणून पीएचडी करणे अशा संकल्पना तयार झाल्या. म्हणूनच देशात परदेशात ठीकठीकाणी पीएचडी तयार करण्याचे कारखाने निघाले. (काही संस्थांमधे, विद्यापीठांमधे खरंच चांगलं संशोधन होतं पण बहुतांश ठीकाणी पाट्याच टाकल्या जातात.) पूर्वी मॅट्रीक झालेल्या व्यक्तीला बर्‍यापैकी नोकरी मिळत असे, ग्रॅज्युएट होणं म्हणजे डोक्यावरून पाणी. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण म्हणजे अति झालं आणि महाविद्यालयात पदवीच्या कोर्सेसना शिकवायला पदव्युत्तर शिक्षण अनिवार्य केलं गेलं. मग मधे नेट-सेट हा प्रकार आला. पण त्यातून फक्त विषय ज्ञानाची घोकंपट्टीची क्षमता बर्‍याच विषयात दिसून येते पण संशोधन क्षमता नाही. त्यामुळे मग पुन्हा नेट-सेट बरोबरच पीएचडी पण असलं पाहिजे हे अनिवार्य झालं. त्यामुळेच आता पीएचडी हे अ‍ॅकॅडमीक्स मधे करीअर करण्यासाठी पहिली पायरी आहे. 

पीएचडी करण्यामागचा हेतूच बदलल्याने नवनविन संशोधन बाजूलाच राहीले आहे पण महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षणाचा दर्जा सुधारला नाहीच. मी स्वत: पीएचडी करायला सुरूवात केल्यावर अनेकांनी मला अनेक बालीश प्रश्न विचारून, अनेक खोचक आणि बोचणारे भोचक प्रश्न विचारून, टोमणे मारून खूप भंडावून सोडलं होतं. काहींच्या मते पीएचडी हे एक ते दोन वर्षात संपतं, तर काहींच्या मते त्यात काय दुसर्‍यांनी काय लिहीलंय तेच कॉपी पेस्ट करायचं असतं. पीएचडी संदर्भात इतकं अज्ञान आणि टोकाचे गैरसमज होण्यास कारणं देखील तशीच असावीत. कारण काहीजण संशोधनातले रजनीकांत असल्यासारखे वर्षाला ३-४ रीसर्च पेपर्स पाडतात (पब्लीश करतात), तर काहींना पब्लीशींग करणं म्हणजे नक्की काय करतात हे देखील माहिती नसतं आणि मग ते कॉपी पेस्ट करत बसतात. असो. तर हे आणि असे अनेक गैरसमज दूर करण्यासाठी पीएचडी म्हणजे नक्की काय?, संशोधन म्हणजे नक्की काय?, ते कसं करणं अपेक्षीत आहे?, पेपर पब्लीशींग म्हणजे काय?, ते कशासाठी करतात?, पीएचडी करण्यामागचं वलय नष्ट होण्यामागची कारणं काय? यासगळ्याचा उहापोह करण्यासाठी ही छोटी लेखमाला काही भागांमधे लिहीत आहे. यात माझे स्वत:चे अनुभव, काही इतरांचे अनुभव, काही निरीक्षणे यांचे संदर्भ घेतलेले आहेत. जर कोणत्याही मजकुरात किंवा व्यक्तींमधे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा पण फिक्षन नाही. कारण जे लिहीणार आहे ते वास्तव आहे. या लेखमालेतील लेखांमुळे अनेकांचे पीएचडी संदर्भातील समज, गैरसमज दूर होतील आणि जर कुणाला संशोधन करण्यास प्रेरणा मिळाली तर ते सोन्याहून पिवळं असेल यात शंका नाही.
 पीएचडी - अपेक्षा आणि वास्तव (भाग २) : पीएचडी गाईड

Thursday 16 April 2015

अगोरा: हायपेशीयाची गोष्ट!!



अगोरा, म्हणजेच प्राचीन ग्रीक भाषेत जनतेच्या एकत्रिकरणाची एक सार्वजनीक जागा. हा चित्रपट ख्रिस्ताच्या मत्युनंतर ३५१ साली अलेझांड्रीया या प्राचीन इजीप्त मधील विद्यापीठीय शहरात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. ही गोष्ट हायपेशीया (अलेक्झांड्रीया मधील एक तत्त्वज्ञ, गणिती, आंतराळशास्त्राची अभ्यासक), तिचे विद्यार्थी, तिच्या वडिलांचे गुलाम यांच्यावर आणि एकूणच अलेक्झांड्रीयावर ख्रिस्ती मिशनरी लोकांच्या धर्मांतराच्या राजकारणाचा झालेला परिणाम यावर आधारित आहे.  हायपेशीया ही अलेझांड्रीया मधील प्लेटोच्या विचारांवर आधारित विद्यापीठात तत्त्वज्ञान आणि आंतराळशास्त्राची शिक्षीका असते की जिथे भविष्यातील नेते शिक्षण घेत असतात. तिच्या शिष्यवर्गात पेगन, ख्रिश्चन, ज्यु असे सर्वधर्मीय विद्यार्थी असतात. तिचे वडील त्या विद्यापीठाचे प्रमुख असतात आणि त्यांना तिच्यातील बुद्धीमत्तेची जाण असते. त्यामुळेच तिच्या विद्यार्थ्यांमधील सरदार पुत्राने तिला मागणी घातली तरी तिने लग्न करावं असं त्यांना वाटत नाही. कारण त्यांना त्याकाळच्या एकूणच पुरूषप्रधान सामाजिक परिस्थीतीची जाण असते आणि अशा पुरूषप्रधान वातावरणात तिला लग्नानंतर मुक्तपणे विचार करण्याची, बोलण्याची संधी देखील दिली जाणार नाही याची त्यांना खात्रीच असते.
 
त्याकाळी इजिप्त मधे जरी रोमन लोकांचं राज्य असलं तरी तिथे ग्रीक पेगन, ज्यु, ख्रिस्ती असे सर्व धर्मीय रहात असतात. त्यातच रोमन साम्राज्यामधे/ग्रीक संस्कृतीमधे विविध ठीकाणांहून जिंकून आणलेल्या लोकांना गुलाम म्हणून ठेवण्याची पद्धत होती. त्यामुळेच विद्वान आणि गुलाम, गरीब, अज्ञानी असा भेदभाव समाजात तयार झालेला होता. त्याचाच नेमका गैरफायदा ख्रिस्ती मिशनर्‍यांनी घ्यायला सुरूवात केली. गरीब, अज्ञानी, गुलाम लोकांना पेगन लोकांविरूद्ध फितवुन, पेगन लोकांच्या देवदेवतांची भर चौकात (अगोरा मधे) खिल्ली उडवुन ते त्यांना ख्रिस्ती धर्म स्विकारण्यास उद्द्युक्त करत. याची परिणती अलेक्झांड्रीया मधील विद्वान, विद्यार्थी आणि बाहेरचे धर्मांतरीत ख्रिस्ती लोक यांच्यातील संघर्षात होते. बर्‍याच संहारानंतर तेथील स्थानीक रोमन सरदार पेगन लोकांना अलेक्झांड्रीयातील ग्रंथालय सोडण्यास सांगतो आणि ख्रिस्ती लोकांना त्यात प्रवेश देण्याचे आदेश काढतो. यासगळ्या बरोबरच ग्रंथालयातील ग्रंथसंपदा नष्ट केली जाते, देवदेवतांचे पुतळे, सुंदर कोरीव काम असलेले खांब हे सगळेच नष्ट केले जातात. 

काही काळानंतर ख्रिस्ती धर्माचा प्रभाव वाढून पेगन धर्मावर बंदी आणली जाते आणि सर्वांनी फक्त ख्रिस्ती आणि ज्यु धर्म पाळावा असा फतवा काढला जातो. हायपेशीया तिच्या विश्वासू लोकांबरोबर अलेक्झांड्रीया मधेच राहून आपलं संशोधन, अभ्यास, अध्ययन, अध्यापन चालू ठेवते. काही वर्षांनंतर तिचे बरेच विद्यार्थी महत्त्वाच्या पदांवर बसतात. जसे त्या भागाचा रोमन सरदार, दुसर्‍या प्रांताचा ख्रिस्ती बिशप इ. दर्म्यान तिच्या वडिलांकडे जे गुलाम असतात त्यांना ती त्या संघर्षा नंतरच मुक्त करते. त्यातील एक देवास नावाचा गुलाम (की ज्याचं तिच्यावर खूप प्रेम असतं) ख्रिस्ती धर्म स्विकारून ख्रिस्ती लोकांच्या एका टोळीत सामील होतो की जी हाणामारी, जाळपोळ, इतरांना त्रास देणे, लोकांना मारणे ह्या असल्या गोष्टी धर्माच्या नावाखाली करत असते. 

पेगन लोकांना पूर्णपणे काढून टाकल्यावर ख्रिस्ती मिशनरी आपला मोर्चा ज्यु लोकांकडे वळवतात आणि त्याच पद्धतीने एक तर मरा किंवा ख्रिस्ती धर्म स्विकारा अशा पद्धतीचा दबाव आणून सर्वांना धर्मांतरीत करतात. हायपेशीया ही तिथल्या राज्यसभेत सल्लागार म्हणून असते. तिच्यावर देखील ख्रिस्ती धर्म स्विकारण्याचे दडपण आणले जाते पण ती त्याचा विरोध करून पेगन राहणेच स्विकारते. या तिच्या निर्णयावर स्थानीक ख्रिस्ती बिशप "स्त्रियांनी शिकू नये, आणि शिकल्याच तर पुरूषांना शिकवु नये, त्यांना सल्ले देवू नयेत..." अशा आशयाचे बायबल मधील लेखन वाचून दाखवतो आणि तिला ख्रिस्तीधर्म विरोधी घोषीत करतो. नाईलाजास्तव तिच्या विद्यार्थ्यांना देखील हा फतवा मानावच लागतो. अखेर हायपेशीयाची अलेक्झांड्रीयातील त्याच ग्रंथालयात (की जिथे पूर्वी पेगन लोकांची देवता होती आणि ख्रिस्ती लोकांनी ती मूर्ती पाडून त्या जागी क्रॉस ठेवलेला असतो) दगडांनी ठेचून हत्या केली जाते. हायपेशीयाच्या हत्येच्या एक दिवस आधीच तिला आकाशात सूर्याभोवती पृथ्वी, गुरू, शनी हे ग्रह इलिप्टीकल ऑर्बीटमधे फिरतात याचा शोध लागलेला असतो. पण ते ज्ञान धर्मांधांनी तिच्या केलेल्या हत्येबरोबरच लुप्त होते. त्या घटनेनंतर जवळ जवळ १२०० वर्षांनी केपलर नावाच्या पाश्चात्य शास्त्रज्ञाला हाच शोध लागला. म्हणजे धर्मांधते मुळे आंतराळशास्त्राचे खूपच नुकसान झाले आणि सगळे शोध १२०० वर्षे मागे पडले. 

त्याकाळात भारतीय उपखंडात आपले लोक खूपच प्रगत होते. पण नंतर अशाच धर्मांध आक्रमणांमुळे त्यांना देखील आपला जीव आणि ज्ञान गमवावे लागले. पेगन संस्कृती रोमन साम्राज्यांतून पूर्णपणे नष्ट होण्यास त्यांच्या सामाजिक स्तरांतील फरक कारणीभूत आहे. तुलनेने आपल्याकडे जरी चातुर्वर्ण्य व्यवस्था असली तरी समाजात एकसंधपणा होता. चारही वर्णांना एकमेकांची गरज लागत असे. त्यामुळेच हिंदू धर्म पूर्णपणे नष्ट करणे ख्रिस्ती आणि मुसलमान यांना अजुनही शक्य झालेले नाही. त्याच बरोबर आपली ज्ञान परंपरा ही मौखिक आणि श्रुती/स्मृती वर आधारीत असल्याने पुढील पीढीकडे वारसा हक्काने सहजतेने त्याचे संक्रमण होत असे. त्यामुळेच त्याचे बर्‍याच प्रमाणात जतन झाले. मेकॉलेची शिक्षणपद्धती आल्यानंतर सगळंच बदललं. पुढचा शैक्षणिक इतिहास सर्व ज्ञात आहेच.  अगोरा हा चित्रपट जरूर पहावा. त्याने पूर्वीच्या रक्तरंजीत धर्मांध इतिहासाची माहिती मिळते. तसेच जागतिक इतिहासाचे अवलोकन करण्याची प्रेरणा देखील मिळते.
हा या चित्रपटाचा दुवा