Friday 23 December 2011

१०० वर्षांनंतरचं जग: भविष्यातील भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञान!!

ल्पना करा की १०० वर्षांनंतर दोन अनोळखी व्यक्ती एकमेकांसमोर अचानक आल्यावर आणि त्यांनी एकमेकांकडे पाहिल्यावर ताबडतोब एकमेकांना समोरच्या व्यक्तीबद्दलची सर्व माहिती मिळते आणि तुम्ही सुसंवाद साधू शकता. जर समोरचा माणूस जपानी भाषेत बोलत असेल आणि तुमची भाषा मराठी असेल तर तुम्हाला ती व्यक्ती जपानीत जे बोलत असेल ते मराठीत भाषांतर होऊन वाचायला किंवा ऐकायला मिळेल. नुसत्या कल्पनेने आपल्याला जिथं जायचं तिथं आपण जाऊ शकू. म्हणजे अगदी आपल्या पौराणिक कथांमधील देवांना जश्या शक्ती अवगत होत्या तशाच शक्ती आपल्याला शंभर वर्षांनंतर अवगत असतील. हे सगळं चमत्कारांमुळे शक्य होणार नसून माहिती तंत्रज्ञान आणि संगणक विज्ञानातील वाढत्या संशोधनामुळे हे सगळं शक्य होणार आहे. जिथे जिथे तीच तीच कामं असतील (उदा: कारकुनी काम, विशिष्ट गोष्टींची मोजमापं, विशिष्ट प्रकारचे कपडे शिवणे, फाईलिंग करणे इ.) तिथे तिथे स्वयंचलित संगणक (रोबो) काम करायला सुरुवात करेल. सध्या संगणकाचा आकार छोटा छोटा होत चालला आहे पण त्याची क्षमता वाढते आहे, याचाच उपयोग होऊन संगणकाच्या छोट्या चिप्स आपल्या शरीरात (मेंदूपाशी) बसवल्या जातील, काही चिप्स या डोळ्यात तर काही कानात बसवल्या जातील. मग मनात येण्याचा अवकाश त्या त्या गोष्टी घडू लागतील. शरीरात बसवलेल्या संगणकीय चिप्स या इतर वस्तूंमधील चिप्सशी जोडलेल्या असल्याने आपण फक्त मनात आणलं तर एखादी वस्तू एका जागेवरून दुसर्‍या जागेवर नेऊ शकू.


आपल्याकडे असे चष्मे असतील की ज्यात आपलं संपूर्ण ऑफिस सामावलेलं असेल. ते चष्मे डोळ्यावर चढवले की आपल्या ऑफिसमधील कामाच्या फाइल्स संगणकावर म्हणजेच आपल्या डोळ्यांसमोर दिसायला लागतील आणि आपण फक्त मनात विचार आणून ऑफिसमधले काम पूर्ण करू शकू. त्यासाठी प्रत्यक्षात कळफलक आणि माऊस घेऊन बसण्याची गरज लागणार नाही. हे सगळं शक्य होईल आंतरजालीय जोडणीमुळे. त्यावेळी ही आंतरजालीय जोडणी (इंटरनेट कनेक्टीव्हीटी) वायरलेस आणि कोणत्याही वेळी, कोणासही, कुठेही उपलब्ध असेल. उदा: जर आपण पुण्यात शनिवारवाडा पाहायला गेलो तर सगळीकडे आपल्याला उद्ध्वस्त झालेल्या जागा दिसतील. पण हेच ऑगमेंटेड रीऍलीटीचा वापर करून आपल्याला पेशवेकालीन शनिवार वाड्याचं रूपडं तसेच त्यावेळी तिथे चालू असलेल्या घटना यांचा अनुभव घेता येईल. या तंत्रज्ञानाला ऑगमेंटेड रीऍलीटी असं म्हणतात. उडत्या मोटार कार्स असतील. बोलती तसेच हुशार भिंत असेल. उदा: जर आपल्याला आपल्या घरातील भिंतीचा रंग आवडला नाही तर आपण भिंतीशी बोलून तो रंग बदलू शकू. कारण सगळीकडेच संगणकीय चिप्स असतील. प्रा काकु यांच्या म्हणण्यानुसार संगणकीय चिप्स त्यावेळी खूपच स्वस्त म्हणजे एका पेनीला एक अशी चीप की ज्यात आपण प्रचंड माहिती साठवू शकू.


सायन्स फिक्शनच्या चित्रपटाची स्टोरी वाटतेय ना? खरंय, पण सध्या ज्या वेगाने संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टीफीशीअल इंटॅलीजन्स), जैवतंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी), सूक्ष्मजीवशास्त्र (मायक्रोबायोलॉजी) या सगळ्या शाखांतील अद्ययावत संशोधन आणि या सर्व शाखांच्या संशोधनाचा संयुक्तपणे वापर चालू झाल्यावर वरील सर्व गोष्टी अशक्य अजिबात नाहीत. हेच सर्व अतिशय सकारात्मक दृष्ट्या प्रा मिचिओ काकु आपल्याला त्यांच्या "१०० वर्षांनंतरचं जग: भविष्यातील भौतिकशास्त्र" या पुस्तकात पटवून देतात. अगदी आपल्या मलमूत्रांचे स्वयंचलित पद्धतीने (आपल्या टॉयलेट सीटमधील सॅंपल्स डायरेक्ट अ‍ॅनालाईझ केल्याने) चिकित्सा करून आपल्या शरीरात नेमक्या कोणत्या कमतरता निर्माण झाल्या आहेत आणि मग त्यासाठी आपण काय करायला हवे, आपल्याला एखादा रोग होण्याची(कर्करोग, मधुमेह) लक्षणं दिसत असतील तर त्याचेही निदान(प्रेडीक्षन) या स्वयंचलित संगणक प्रणालीद्वारे होऊन आपल्याला त्याची आगाऊ सूचना मिळू शकेल. मानवी शरीरातील वय वाढण्याची (एजींग) प्रक्रिया आपल्या शरीरातील पेशींच्या विभाजनाला तसेच ऑक्सीडेशन प्रक्रियेला नियंत्रित करून प्रलंबित किंवा पूर्णपणे थांबवता येणं शक्य आहे. पौराणिक कथांमध्ये आपण वाचतोच की देव किंवा अगदी महाभारतकालीन कौरव-पांडवादी पात्रंसुद्धा कित्येक शतकं जगत असत. काही जणांना अमरत्वही प्राप्त होऊ शकेल.


प्रा. मिचिओ काकुंनी या पुस्तकात जे काही अंदाज बांधलेले आहेत त्याला भविष्यवेध शास्त्राचा आणि सध्याच्या अद्ययावत संशोधनाचा आधार आहे. इतकं सगळं असूनही ते हे मान्य करतात की स्वयंचलित संगणक (रोबो) हे फक्त तीच तीच कामं करू शकतात. माणसातील समजशक्ती(कॉमन सेन्स),अनुभवातून येणारा शहाणपणा आणि नैसर्गिक बुद्धिमत्ता तसेच भावनांचा आविष्कार हा स्वयंचलित संगणकांत शक्य नाही. त्यामुळे जिथे जिथे या गोष्टींची आवश्यकता आहे तिथे तिथे माणसाची गरज लागणारच आहे हे सुद्धा स्पष्ट केलं आहे.


या पुस्तकासंदर्भात किंवा त्यात रंगवलेल्या भविष्यासंदर्भात पुष्कळ टीका झालेली आहे. सध्या संगणकाच्या चिप्स बनवण्यासाठी सिलीकॉन व्हॅलीमधील नेक कंपन्या कार्यरत आहेत. जसजशी संगणकीय चिप्सची क्षमता वाढते आहे तसतसं एक चीप तयार करायला लागणार्‍या शुद्ध पाण्याचं प्रमाणही वाढतं आहे. एकदा का चीप तयार केली की जे टाकाऊ पाणी उरतं ते कोणीही वापरण्यास म्हणजे अगदी झाडांना घालण्यासही अयोग्य आणि विषारी असतं. त्यानं जमिनींमधील कस संपून त्या उजाड बनतात. तयार होणारा संगणकीय कचरा ही एक मोठी डोकेदुखी झालेली आहे. सध्या प्रगत राष्ट्रांतील संगणकीय कचरा हा प्रगतिशील किंवा अप्रगत राष्ट्रांमध्ये आणून टाकला जातोय. अगदी भारतात सुद्धा डोनेशनच्या नावाखाली कमी क्षमतेचे संगणक खेड्यापाड्यांतील शाळांत पुरवले जातायत. त्यांचा उपयोग फारसा होत नसतोच. फक्त अजून तीन चार वर्ष ते तिकडे धूळ खात पडलेले असतात.


या पुस्तकात उल्लेखलेलं तंत्रज्ञान जरी प्रगतीपथावर असलं तरी या सगळ्यासाठी लागणारा माहितीचा साठा तसेच त्यासाठी लागणारी वीज या गोष्टी वस्तुस्थितीला धरून वाटत नाहीत. प्रा काकु हे सुद्धा म्हणतात की जिथे आंतरजाल (इंटरनेट) आहे तिथे ज्ञान आणि पैसा आहे आणि जिथे आंतरजाल नाही तिथे दारिद्र्य, अज्ञान आणि दु:ख आहे. खरं तर तरीही त्यांनी रंगवलेलं चित्रं हे एका विशिष्ट प्रकारच्या जीवनशैलीला, तसेच प्रगत देशांतील परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून साकारलेलं आहे. मला नाही वाटत की ते  तंत्रज्ञान भारतासारख्या एकावेळी अनेक शतकांत जगणार्‍या देशांत सर्रास वापरात आलेले असेल. इथले प्रश्नच वेगळे आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं केवळ अद्ययावत विज्ञान तंत्रज्ञानात मिळणं अवघड आहे. इथली परिस्थिती बदलायची असेल तर या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याकडील एकाचवेळी अनेक शतकांत जगणार्‍या जनतेमध्ये जी दरी उत्पन्न झाली आहे ती दरी शिक्षणामुळे संपवली पाहिजे. जगण्यास आवश्यक अशा मूलभूत गोष्टी, स्वच्छता यांविषयीची जागरूकता या अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून पोहोचवली पाहिजे. एकदा का दरी कमी होत आली की मग मानवीमूल्यांचा र्‍हास न होता प्राध्यापक काकु म्हणतात तसा अद्ययावत तंत्रज्ञानाचा जीवनमान उंचावायला आणि सुधारायला उपयोग करून घेता येईल.


सध्या तरी एक सायन्स फिक्शन म्हणूनच हे पुस्तक वाचायला हरकत नाही पण हा एक भविष्यवेध आहे. याचा अर्थ भविष्यात तंतोतंत असंच होऊ शकतं, याचं भविष्यकथन केलेलं आहे असा अर्थ काढणं चुकीचं ठरेल.या पुस्तकातील बर्‍याच गोष्टी अतिशय काल्पनिक आणि अव्यवहार्य वाटू शकतात पण तरीही विचारांना चालना देणारं पुस्तक म्हणून याकडे बघायला काहीच हरकत नाही.


पुस्तकाचं नाव: Physics of the future: How Science will Shape Human Destiny and our Daily Lives by the Year 2100 लेखक: मिचिओ काकु (थिऑरॉटीकल फिजीक्स, सिटी कॉलेज, न्युयॉर्क विश्वविद्यालय) प्रकाशक: Knopf Doubleday Publishing Group

Wednesday 21 December 2011

भारतरत्न पुरस्काराचे महाभारत!

भारतरत्न, हिंदूस्थानातील एक सर्वोच्च नागरी पुरस्कार! भारतरत्न अशा व्यक्तीला दिला जातो की ज्याने मानवतेसाठी, समाजासाठी उच्चकोटीची तसेच भरगच्च कामगीरी केलेली आहे. सुरूवातीला हा पुरस्कार देशासाठी भरीव कामगीरी केलेल्या व्यक्तींना दिला जात असे. पण आता हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला दिला जातो त्यासाठी ती व्यक्ती भारतीय नागरीक असण्याचंही कारण नाही आणि त्या व्यक्तीने भारतीय समाजासाठी विशेष केलेलं असण्याचीही आवश्यकता नाही. ह्या पुरस्काराची घोषणा भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र पसाद यांनी २ जानेवारी १९५४ ला केली. सुरूवातीला हा पुरस्कार केवळ जीवंत असलेल्या व्यक्तींनाच देण्यात यावा अशी तरतूद होती पण जानेवारी १९५५ मधे त्यात सुधारणा घडवली गेली आणि हा पुरस्कार मरणोत्तर देण्यासही सुरूवात झाली.
अत्तापर्यंत हा पुरस्कार एकूण ४१ व्यक्तींना देण्यात आलेला आहे. त्याची यादी विकीपीडीया इथे उपलब्ध आहे. त्यातील दोन व्यक्ती खान अब्दुल गफारखान (सरहद्द गांधी) आणि नेल्सन मंडेला भारतीय नागरीक नाहीत. हा पुरस्कार देण्यासाठी नक्की कोणते निकष लावले जातात याचे जाहीर प्रकाशन फारसे उपलब्ध नाही. अत्तापर्यंत जे काही बाहेर आले आहे त्यावरून असेच वाटते की विशिष्ठ क्षेत्रातील व्यक्ती------जिवंत अथवा मृत आणि त्यांनी केलेली कामगीरी इतकेच निकष दिसतात. आपण जर यादी नीट पाहीली तर अधिकाधिक वेळा पुरस्कार प्राप्त व्यक्ती ह्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत, राजकीय व्यक्ती तसेच कॉंग्रेसशी संबंधीत आहेत. उदा. राजीव गांधींनी अशी कोणती भरीव कामगीरी भारत देशासाठी किंवा मानवतेसाठी किंवा समाजासाठी केलेली आहे या प्रश्नाचं उत्तर शोधूनही सापडणार नाही. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या व्यक्ती कला क्षेत्र (सुब्बालक्ष्मी, सत्यजीत रे, पं भिमसेन जोशी, लता मंगेशकर, पं रविशंकर, शहनाई सम्राट बिस्मील्ला खान, एम जी रामचंद्रन), सामाजिक कार्य (विनोबा भावे, धोंडो केशव कर्वे, मदर टेरेसा, नेल्सन मंडेला) तसेच विद्वान-शास्त्रज्ञ (सी व्ही रामन, ए पी जे अब्दुल कलाम, अमर्त्य सेन, डॉ आंबेडकर, पांडुरंग वामन काणे, झाकीर हुसेन, विश्वेश्वरैय्या), उद्योजक (जे आर डी टाटा) यांची नावं आहेत. एम जी रामचंद्रन यांनी मानवतेसाठी आणि समाजासाठी नक्की काय भरीव कामगीरी केलेली आहे हे समजत नाही. राजकीय क्षेत्रातील अनेक नावं अशी आहेत की त्यांच्या भरीव (??) कामगीरी बद्धल प्रश्न पडतात.
यात अजुन एक महत्त्वाचा मुद्दा राहून जातोय आणि तो म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना दिलेलं मरणोत्तर भारतरत्न काढून घेणे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण कामगीरी कोणीच नाकारू शकत नाही. म्हणजे अगदी जवाहरलाल नेहरूंच्या पेक्षाही भरीव कामगीरी नेताजींची आहे. पण केवळ त्यांच्या मृत्युचं सर्टीफिकीट नाही म्हणून त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाता कामा नये असे म्हणून दिलेला पुरस्कार नाकारण्यात आला. आता एक गंमत बघा की हेच कॉंग्रेस सरकार सार्‍या जगाला ओरडून सांगत असतं की सुभाषचंद्र बोस जिवंत नाहीत.....ते जिवंत असणं शक्यच नाहीत असं त्यांचे नातेवाईकही मान्य करतात. मग भारतरत्न पुरस्काराच्याच वेळी यांना ते मृत नाहीत असं का वाटावं? मुख्य म्हणजे लोकांकडून मागणी होते म्हणून घटनेत दुरूस्ती करून भारतरत्न पुरस्कार देण्यात येण्याच्या यादीत खेळाडूंची वर्णी लावली गेली. पण सुभाषचंद्र बोसांवर किती अन्याय होतो आहे याचा कुणीही विचारही करत नाही. इंदिरा गांधीला १९७१ साली हा पुरस्कार देण्यात आला आणि १९७५ साली तिने लोकशाहीची पायमल्ली करून देशात आणीबाणी निर्माण केली. मग ही भारतरत्न पुरस्काराची पायमल्ली नाही काय? राजीव गांधींचं नाव बोफोर्स गैरव्यवहारांसहित स्विस बॅंकेतील काळ्या पैशासंदर्भातही आलेले आहे. मग एकूणातच काहीही कामगीरी न केलेल्या आणि भ्रष्टाचारात नाव गोवले गेलेल्या व्यक्तीचं भारतरत्न का काढून घेऊ नये?
सचिन तेंडूलकरने क्रिकेट या खेळात भव्य कामगीरी केलेली आहे. तशी ध्यानचंद यांनीही तेंडूलकर जन्माला येण्याआधी हॉकीच्या क्षेत्रात सुवर्ण कामगीरी केलेली आहे. मग केवळ सचिन तेंडूलकरसाठी (म्हणजे क्रिकेट साठी) नियम बदल केले जातात. [मी हे असं लिहीलं आहे याचा अर्थ मी सचिन तेंडूलकरची कामगीरी आजीबात महत्त्वाची नाही असं म्हणते आहे असा होत नाही.] उद्या अमिताभ बच्चनचे चाहते एकत्र येऊन त्याला भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करतील. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे क्रिकेटमधला नाही. त्यामुळे वयाच्या चाळीशीतच भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला तर त्याला पुढे कोणताच भारतातील पुरस्कार स्विकारता येणार नाही. याउलट मला असं वाटतं की अत्ता त्याला हा पुरस्कार न देऊन त्याला भारतीय समाजासाठी/ मानवतेसाठी काही उत्तम करण्याची संधी मिळेल आणि त्यामुळे भविष्यात जेव्हा हा पुरस्कार त्याला दिला जाईल तेव्हा आपल्या सगळ्यांसाठीच ते अधिक अभिमानास्पद असेल.
बिस्मिल्ला खान यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानंतरही आयुष्यातील शेवटची काही वर्षं त्यांनी हालाखीत एका झोपडीत औषधपाण्याविना काढलेली आहेत. काय उपयोग त्या भारतरत्न पुरस्काराचा? ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबाबतीतही त्यांचा अपमान होण्याचे अनेक प्रसंग घडले आहेत.
हे भारतरत्न पुरस्कार वगैरे सगळा दिखावा आहे. नागरी पुरस्कार देण्याची जी कमिटी आहे त्या कमिटीवर तसेच सत्ता कोणत्या पक्षाच्या हाती आहे त्यावर हे सगळं अवलंबून आहे. वर नमूद केल्याप्रमाणे राजीव गांधी, इंदिरा गांधी तसेच इतरही काही पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या बाबतीत जे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तसं होऊ नये याची काळजी घेण्यासाठी भारतरत्न पुरस्कार पात्रता निवडीत वयाची अटही असावी असे वाटते. म्हणजे व्यक्तीला अधिक काळ परखून मगच हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला जावा. मला असं वाटतं की सद्य परिस्थीतीत तसेच निकषांच्या बाबतीत पारदर्शकता असावी तसेच हा पुरस्कार मरणोत्तरच दिला जावा म्हणजे पुरस्कार प्राप्त काही विद्यमानांचा (बिस्मिल्ला खां आणि अब्दुल कलाम) जसा अपमान होतो आहे/झाला आहे तो तरी भविष्यात होणार नाही. तरच या पुरस्काराची मानदंडता राखली जाईल. नाहीतर दिवसेंदिवस त्याचे महत्त्व कमी होत राहील यात शंका नाही.

Sunday 18 September 2011

चक दे इंडिया!!

महाजालावरून साभार
आमच्या शाळेत पूर्वी फुटबॉल अणि हॉकी या दोन खेळांची प्रत्येकी एक आणि दोन अशी मैदानं होती. आता होतीच म्हणायला हवं कारण गेल्या काही वर्षांत त्या मैदानांचं रूपांतर एकत्रितपणे एका क्रिकेटच्या ग्राऊंड्मध्ये झालंय. साठ-सत्तरच्या दशकातले चित्रपट पाहिले तर बॉलिवुड सिनेमांमध्येही कॉलेज तरूणांच्या हातात हॉकी-स्टीक्स दाखवून हॉकी या राष्ट्रीय खेळाला जागा दिल्याचं दिसून येतं. तसा या दशकात हॉकी वर ’चक दे इंडिया" आला आणि रसिकांना आवडलाही पण तो परिणाम तातपुरताच राहिला. हिंदीच्या पाठ्यपुस्तकात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद या नावाने धडाही होता पण त्या व्यतिरीक्त इतर कुठेही ध्यानचंदयांचं नाव झळकताना पाहिल्याचं मला तरी आठवत नाही. याने त्यांची कामगिरी छोटी होते असं नाही पण ’"रात गयी बात गयी” सारखं व्यक्ती काळाच्या पडद्या आड गेली की त्या व्यक्तीचं कर्तुत्त्व कितीही मोठं असलं तरी विसरलं जातं. तसंच काहीसं मेजर ध्यानचंद यांच्या बाबतीत झालं असं वाटतंय. मागे एकदा वर्तमानपत्रात भारतीय हॉकीचा कप्तान धनराज पिल्ले याचं नाव वाचण्यात आलं. तेव्हा भारतीय संघाने कोणत्यातरी आंतरार्ष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकलेलं होतं. धनराज पिल्लेसुद्धा पिंपरी-चिंचवड मधील एका झोपडपट्टीत रहात होता. मग त्याला आर्थिक मदत करण्याविषयीची आवाहनं वाचण्यात आली. त्यानंतर एकदोन वेळा दूरदर्शनवरही झळकला होता बिचारा. पण नंतर कुठेच दिसला नाही. नुकतंच भारतीय हॉकी संघातील युवराज या खेळाडूच्या बाबतीत  असंच काहीसं झालं आणि त्या निमित्ताने हे सगळं डोक्यात आलं आणि नकळत सध्याचा भारतातील धर्म-खेळ क्रिकेट आणि राष्ट्रीय खेळ हॉकी यांची तुलना सुरू झाली.  

महाजालावरून साभार
१९७० च्या शेवटी आणि १९८० च्या सुरूवातीला सुनिल गावसकर, दिलीप वेंगसरकर, गुंडप्पा विश्वनाथ आणि इतर बर्‍याच क्रिकेटपटुंमुळे भारतातील क्रिकेटने मध्यमवर्गियांच्या आयुष्यात प्रवेश केला. तोपर्यंत क्रिकेट हा खेळ तसा श्रीमंती खेळ मानला जात असे. कसोटी क्रिकेटचे सामने ५-५ दिवस चालायचे. आपली कामं सोडून ५ दिवस खेळ बघायला येणारे फक्त श्रीमंतच. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये हा खेळ फारसा प्रसिद्ध नव्हता. नवाब मन्सुर अली खान पतौडी हे नाव त्यावेळी भारतीय क्रिकेटमध्ये आदराने घेतलं जायचं. साधारणपणे ८० च्या दशकात भारतात दूरदर्शन चालू झालं आणि क्रिकेट हा खेळ दूरदर्शन पाठोपाठ घरोघरी पोहोचला.  
८० च्याच दशकात क्रिकेट या खेळात "वन डे क्रिकेट" च्यारूपाने क्रांती झाली. या "वन डे क्रिकेट" मुळे क्रिकेट जगतात उलथा पालथ झाली आणि पाच दिवसांच्या तुलनेत एक दिवस खेळणं सुटसुटीत वाटल्याने सामन्यांची संख्याही वाढली, त्याला लागणारी कौशल्य  कसोटी क्रिकेटपेक्षा वेगळी होती. अधिक प्रेक्षवर्ग आणि मध्यमवर्गीय आर्थिक स्तरांतून आलेले खेळाडू पाहून सामान्य जनतेला क्रिकेट आपलं वाटू लागलं.

इकडे वाढत्या प्रेक्षक संख्येने आणि उपग्रह वाहिन्यांमुळे दूरदर्शन प्रक्षेपणात झालेल्या अमूलाग्र क्रांतीने तसेच वन-डे मुळे क्रिकेट फिव्हर "इट क्रिकेट, स्लीप क्रिकेट, ड्रिंक क्रिकेट इ. इ." पासून आता हे क्रिकेट वेडाचं लोण गल्ली-बोळ आणि झोपडपट्ट्यांमध्येही पोहोचलं आहे. ग्लोबलायझेशन मुळे जाहीरात कंपन्यांचं फावलं आणि त्यांनी क्रिकेटच्या खेळाडूंसाठी मोठमोठ्या प्रमाणात अनुदानं आणि बक्षिसं द्यायला सुरूवात केली. देशातल्या चलाख राजकारण्यांनी काळाची पावलं वेळीच ओळखून बीसीसीआय सारखी खासगी संस्था उभी केली की जी आता भारतीय क्रिकेटची सर्वेसर्वा झाली आहे आणि भ्रष्टाचार-काळापैसा यांचं आगारही. पूर्वी आपल्याकडे फुटबॉलला किंवा हॉकीला अशी डिमांड असायची. अजुनही आपण बंगाल आणि ईशान्य भारतातील राज्यांत गेलो तर भर पावसात, चिखलात अनेक मुलं फुटबॉल खेळताना दिसतील.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यामुळे मिळणारे पैसे आणि त्याशिवाय युवक-युवतींकडून मिळणार्‍या उस्फूर्त प्रतिसादाचं ग्लॅमर अनेक तरूणांना क्रिकेटकडे आकर्षित करून घ्यायला लागलं. सगळ्यांच्या गळ्यातील ताईत सचिन तेंडूलकरचा उदयही ८० च्या दशकात शेवटी शेवटी झाला आहे. त्याच्या नंतर कित्येक आले आणि गेले, भारतीय क्रिकेट संघाने आपल्या पर्फॉर्मन्सचा लंबक नेहमीच एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत हलता ठेवला पण सचिन तेंडूलकरच्या सातत्याला सलामच ठोकायला हवा. प्रत्येक घरातील आई-वडिलांना आपला बाळ्या सचिन तेंडूलकर बनण्याची स्वप्नं पडतात आणि त्यासाठी बाळ्याने शाळेत जायला सुरूवात केली की पेन्सिलच्या ऐवजी क्रिकेटची बॅट त्याला अधिक समर्थपणे कशी पेलता येईल याकडे लक्ष पुरवलं जातं. बॉलिवुडच्या सिनेनिर्मात्यांनीही या गंगेत "लगान" द्वारे आपले हात धुऊन घेतले. याच कालावधीत पेप्सी आणि कोक यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही क्रिकेटबरोबरच आपलंही बस्तान भारतात बसवलं. कदाचित पेप्सी आणि कोकच्या बाटल्यांमुळे भारतीय तरूणांच्या भावना फक्त क्रिकेटसाठीच उचंबळतात किंवा क्रिकेटसाठी उंचबळणार्‍या भावनांमुळे पेप्सी, कोकलाही भारतीय तरूणांच्या मनात जागा मिळाली...असंही असेल.

संगणक आणि आंतर्जालिय क्रांतीमुळे एकूणच संपूर्ण जगाचा वेग वाढल्याने २०-२० क्रिकेटची संकल्पना आली, की ज्यामध्ये प्रत्येक संघाने प्रत्येकी २० षटकं टाकायची. तीन तासात निकाल जाहिर. हे म्हणजे क्रिकेट वेड्यांच्या देशात तीन तासाच्या बॉलीवुड सिनेमापेक्षा कमी ग्लॅमरस आणि व्यवसाय खेचणारं नव्हतं. म्हणूनच की काय विविध जाहिरात कंपन्या, भारतातील मोठमोठे इंडस्ट्रीयालीस्ट तसेच काही बॉलीवुड स्टार्स यांनी एकत्र येऊन विविध व्यावसायिक संघांची उभारणी केली आणि जगभरातील क्रिकेटपटुंना भरपूर पैसे देऊन आपल्या संघासाठी खरेदी करून त्यांची कडबोळी टीम आय पी एल सारख्या स्पर्धांत खेळवायला सुरूवात केली. गेल्या ३-४ वर्षांत आय पी ल च्या माध्यमातून या सगळ्यांनी खोर्‍याने पैसा मिळवला आहे. तरूणांना मूर्खासारखं वेडं करणारा आणि पैशासाठी देशापेक्षा वैयक्तिक खेळ महत्त्वाचा हा मंत्र देणारा आय पी एल हंगाम म्हणजे भारतातील विविध श्रीमंत लोकांचा विविध क्रिकेटपटुंवर लावलेल्या पैशाचा जुगार. मग यात अनेकांनी आपल्या काळ्या पैशाची धवल-गंगा करण्याच्या प्रक्रियेत नाहून घेतलं. क्रेकेटमधील भ्रष्टाचाराचं दुसरं मोठं केंद्र तयार झालं. बी सी सी आय काय किंवा आय पी एल काय सगळेच एका माळेचे मणी त्यामुळे या दरोडेखोरांना बेड्या कोण घालणार? ज्यांच्या हातात सत्ता त्यांचेच प्रतिनिधी या संघटनांच्या चालक पदावर असल्याने या वळूंना वेसण घालणं अशक्य होऊन बसलंय.

दरम्यान भारताच्या राष्ट्रीय खेळाचं, हॉकीचं काय झालं? भारतीय हॉकीला आंतर्गत राजकारणाचं ग्रहण लागायला ८० च्या दशकातच सुरूवात झाली. हॉकीच्या संघांत मुख्यत: बरेचसे शीख लोक आणि आर्मीत असलेले लोक दिसायचे. साधारणपणे ८० च्या दशकात राजकीय समीकरणं बदलणार्‍या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या देशात घडल्या. एक म्हणजे पंजाब मधील वाढलेला खलिस्तानवाद आणि त्यामुळे झालेली इंदिरा गांधींची हत्त्या....पाठोपाठ आलेला शिख विरोध. त्यामुळे अनेक शिख कुटुंब परदेशात स्थायिक झाली. दुसरं म्हणजे पंजाब मधील दहशतवाद संपुष्टात आला आणि काश्मीर मधील अतिरेकी कारवायांमुळे अशांत झालेला काश्मिर. त्यामुळेच आता आर्मी्ला सुद्धा कायम अतिरेकी हल्ल्यांपासून, घूसखोरांपासून वाचवण्यासाठी सारखं सतर्क रहावं लागतं. तसंच हॉकी या खेळात फारसं ग्लॅमर नसल्याने कदाचित आर्मीमधील लोक हॉकी खेळायला आता येत नसावेत. एकूणच यासगळ्याचा परिणाम भारतीय हॉकीच्या खेळावर झाला असण्याची शक्यता आहे. कारणं काहीही असोत पण भारतीय हॉकीला.......भारताच्या राष्ट्रीय खेळाला ग्रहण लागलंय हे नक्की. आजही अमेरिका किंवा कॅनडात बघितलं तर लोक अनुक्रमे बेसबॉल आणि आईस हॉकी साठी वेडे असतात. का? कारण ते त्यांचे राष्ट्रीय खेळ आहेत. पण आपल्याकडे हॉकी साठी तशाच उचंबळलेल्या भावना दिसून येत नाहीत.

हॉकीचे सोनेरी दिवस संपले आहेत याचंच हे द्योतक होतं. कारण हॉकीला कुणी वाली (अनुदान देणारे, जाहिराती देणारे) नव्हता. पद्धतशीरपणे हॉकीसाठीची अनुदानं हळूहळू कमी केली गेली. लॉर्ड मेकॉलेने जसं स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या गुरूकुल पद्धतीचे शिक्षण बंद पाडण्यासाठी गुरूकुलांना मिळणारे आर्थिक सहाय्य जसं काढून घेतलं तसंच काहीसं हॉकीच्या बाबतीत केलं गेलंय. हॉकी इंडियावर एकतर खेळाडू किंवा ज्यांना भारतीय राजकारणात फारशी किंमत नाही असे राजकिय नेते प्रमुख म्हणून नेमले जाऊ लागले. मग आपोआपच केंद्र सरकारकडून मिळणारं अनुदानही कमी होत गेलं. मधेच वर्तमानपत्रात बातमी वाचली की ४-५ वर्षांपूर्वी झालेल्या एका आंतर्राष्ट्रीय हॉकीच्या स्पर्धा रजिस्ट्रेशनचे काही लाख रूपये केंद्रिय क्रिडामंत्रालयाने हॉकी इंडियाला दिलेच नाहीयेत आणि एकीकडे कॉमनवेल्थ गेम ची वेल्थ कॉमनली लुटून कलमाडी सारखे तिहार मध्ये सुद्धा गेलेत. किती हा विरोधाभास.......ते ही आपल्या राष्ट्रीय खेळाला?

आजकालच्या तरूण रक्तांनी वेगळाच प्रश्न उपस्थित करायला सुरूवात केलीय. भारतात हॉकी फारशी खेळली जात नाही, हॉकीचे सामने झाले तरी कोणाला माहिती नसतं आणि ह्याउलट क्रिकेटसाठी सर्वदेश वेडा झालेला असतो इतका की आम्ही सचिन तेंडूलकरला क्रिकेटचा देव ही उपाधी सुद्धा देऊन टाकली आहे. मग क्रिकेटच का नाही भारताचा राष्ट्रीय खेळ नाही. हॉकीच का? प्रश्न विचार करायला लावणारा म्हणून थोडा शोध घेतला तर धक्कादायक गोष्ट समोर आली. "हॉकी या खेळात भारताला एकूण ८ सुवर्ण पदकं मिळाली आहेत. सन १९२८ ते १९५६ हा हॉकीचा सुवर्णकाळ होता की जेव्हा भारताने सातत्याने ऑलिंपिक्स मध्ये ६ सुवर्णपदकं पटकावली. या सुवर्णकाळात भारताने २४ ऑलिंपिक सामने खेळले आणि एकूण १७८ गोल्स करत (७.४३ गोल प्रत्येक सामन्यात) २४ च्या २४ सामने जिंकले. त्यानंतरची दोन सुवर्णपदकं १९६४ साली तसेच १९८० साली झालेल्या ऑलिंपिक्स मध्ये मिळवलीत. १९८० पर्यंत इतका सुंदर पर्फॉर्मन्स असताना एकदम हॉकीला काय झालं? दूरदर्शन मधील क्रांतीचा उपयोग सर्वच खेळांना व्हायला हवा होता मग तो तसा का झाला नाही? केवळ क्रिकेटच्या खेळामध्येच क्रांती का झाली (वन डे, २०-२०) आणि त्याचंच स्वरूप का बदललं गेलं? क्रिकेट हा इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ आहे. आंतरराष्टीय क्रिकेट मध्ये खेळणारे सर्वच देश हे ब्रिटीशांनी अनेक वर्षे राज्य केलेले आहेत. असं का? ऑलिंपिक्स मध्ये अजुनही क्रिकेट या खेळाचा समावेश का नाही? ऑलिंपिक्स मध्ये ज्या देशांचे सुवर्ण पदक तालिकेत वर्च्यस्व असते असे चीन, अमेरिका, जपान, कोरिया, इंडोनेशिया सारखे देश क्रिकेट मधे का नाहीत? या प्रश्नांची उत्तरं मला अधिक भंडावून सोडतात. प्रश्न उरला क्रिकेटला भारताचा राष्टीय खेळ करण्याचा: तर भारतीय हॉकी संघांसारखी सारखी सातत्यपूर्ण सुवर्ण कामगिरी भारतीय क्रिकेटने अत्तापर्यंत कधिच केलेली नाही. अगदी मार्चच्या शेवटी विश्वचषक जिंकणारे भारतीय क्रिकेटचे विर चारच महिन्यांनंतर इंग्लंडमध्ये माती खातात. विश्वविजेत्याला साजेशी कामगिरी सोडाच पण जागतिक क्रमवारीतही सर्वच प्रकारच्या क्रिकेट मध्ये घसरण करून घेतात. यांना जगज्जेते कसं म्हणणार? बरं क्रिकेट हा खेळ १०-१२ देश खेळतात. १०-१२ देश म्हणजे संपूर्ण विश्व कसं काय होतं? मग हे विश्वविजेते कसे काय या प्रश्नाचं उत्तर (आम्ही विश्वविजेते म्हणण्यास पात्र नाही) भारतीय संघानेच आपल्या नजिकच्या कामगिरीने दिलं आहे. फक्त पॉप्युलॅरीटीच्या जोरावर एखाद्या खेळाला राष्ट्रीय खेळ कसा म्हणणार? खरं तर भारता मध्ये हॉकीच्या दुर्दशेला आणि क्रिकेटच्या अतिरेकाला नक्की कोण जबाबदार आहे याचा पद्धतशीर अभ्यासच व्हायला हवा. मला तर याची बिजं ग्लोबलायझेशन, आर्थिक राजकारण, आणि भ्र्ष्टाचाराच्या संधी यातच दिसताहेत. हॉकी हा भारताचा (नावापुरताच) राष्ट्रीय खेळ राहील याची पुरेपूर तजविज करून थेवलेली आहे. या परिस्थीतीला आपण बदलणार नाहीतर कोण? चला पुन्हा एकदा हॉकीला सुवर्णसिंहासनावर बसवुयात आणि क्रिकेटच्या जुगार्‍यांपासून देशातील युवकांना वाचवूयात. चक दे इंडिया!!

Thursday 1 September 2011

गौरी-गणपती!!

महाजालावरून साभार
घरी पूर्वी पाच-सात दिवसांचे गौरी-गणपती असायचे. काय मजा आणि आनंदसोहळा असायचा तेव्हा!! गणपतींची सकाळ-संध्याकाळ आरती होत असे. मन आणि घर दोन्हीही प्रसन्नतेने भरून जायचं. घरी आठ-दहा दिवस आधीपासूनच गौरी-गणपतींची चाहूल लागायची. मग आजी-आजोबा रहायला येत असत. गौरी बसवण्यासाठी धान्याचे गोल डबे रंगवले जायचे. गौरींचे पितळी मुखवटे चिंच आणि रांगोळीने घासून चकचकीत केल्यावर त्यांचे नाक, डोळे, भुवया, ओठ सगळं रंगवताना खूप छान वाटायचं. मग गौरींसाठी नवीन साड्या-दागिने यांची खरेदी व्हायची. गौरी-गणपतींची आरास तयार व्हायची.  

गणपती बसल्यावर दोनच दिवसांनी रात्री उशीरा पर्यंत जागून गौरींच्या डब्यांत धान्य भरून, डब्यांना गौरींची धडं लावून त्यांना साड्या नेसवायच्या. गौरींच्या आरासीसाठी  घरातली एक खास जागा (शक्यतो बैठकीच्या खोलीतील) रिकामी केली जायची, सगळं घर चमचमत्या झिरमिळ्या आणि विविध रंगांच्या विजेच्या छोट्या दिव्यांच्या माळांनी प्रकाशमान होउन जायचं. पाच-सात दिवस गौरी-गणपती असेपर्यंत घरात आवडते पाहुणेच आल्याची भावना असायची.  दिवस-रात्र घर जागं असायचं. संपूर्ण घर अत्तर-उदबत्त्या यांच्या सुगंधाने भरून आणि भारून जायचं. 

आमची आई इतर वेळची (श्रावणी शुक्रवार, चैत्रगौर इ.) हळदी-कुंकू करायची नाही पण महालक्षमीचं हळदी-कुंकू न चुकता करत असे. गौरींच्या हळदी-कुंकवाला अगदी समोरच रहाणार्‍या ख्रिश्चन आणि मुस्लीम घरातील बायकांना सुद्धा बोलावलं जायचं. तेव्हा शेजारी टॉमी नावाचा कुत्रा असायचा की जो आमच्याकडेच जास्त असायचा. मग लाडू-करंज्या यांसारख्या फराळाच्या पदार्थांच्या वासाने तो सुद्धा गौरींचे दर्शन आत येऊन किमान एकवेळा तरी घेउन जायचा. 

तिसर्‍या दिवशी गौरी-गणपतींच्या जाण्याचे वेध लागायचे. मग सकाळीच आई हरभर्‍याची डाळ भिजत ठेवायची. संध्याकाळी विसर्जनाच्या प्रसादाला लिंबाची वाटलेली डाळ आणि पंचखाद्याची खिरापत असा बेत असायचा. गौरी-गणपतींच्या बरोबर शिदोरी म्हणून दही-पोहे आणि पंचाखाद्याचे कानवले दिले जायचे.  गणपती विसर्जन तर तळ्यावर होत असे पण गौरी विसर्जन म्हणजे फक्त मुखवटे हलवले जात. गौरींना आवाहन करून गौरी स्थानापन्न झाल्यावर जे तेज आणि जो जिवंतपणा त्या पितळी मुखवट्यात असायचा, तेच तेज मुखवटे हलवल्यावर गायब व्हायचं आणि गौरी विसर्जन झाल्याचे संकेत मिळायचे. अशावेळी डोळे भरून येत असत.
गौरी असतांना सगळं वातावरणच भारलेलं असे. ते पाच-सात दिवस घरातच मंदिर तयार होत असे. आता आई गेल्यापासून गौरी आणणं बंद केलंय आणि गणपतीही फक्त दीड दिवसासाठी आणतो. गणपती असेपर्यंत सकाळ-संध्याकाळ आरती प्रसाद असतो, विसर्जनाच्या दिवशी लिंबाची डाळही असते.....दही-पोहे आणि कानवले यांची शिदोरीही असते पण घराचं मंदिर होणं थांबलंय. त्या मंदिराच्या आता फक्त आठवणी आहेत.

Sunday 14 August 2011

ऐ मेरे वतन के लोगों..........

आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे पूर्ण होताहेत. १९४७ पूर्वीच्या सगळ्या स्वातंत्र्य लढ्यांमध्ये स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय याविषयी जो काही विचार झाला होता त्याविचाराचा आणि सध्याच्या स्वातंत्र्याचा (स्वैराचाराचा) अर्थाअर्थी काहीही संबंध राहिलेला नाही. १९४७ नंतर स्वातंत्र्य दिन साजरा करणे म्हणजे एक राष्ट्रीय सण साजरा केला जात असे. आता चौकाचौकातून फलक लावले जातात, काही फोटो लावून त्यांच्यापुढे रांगोळी काढून फोटोंना हारतुरे घातलेले असतात. तिथेच ध्वनिक्षेपकांच्या प्रचंड भिंती लावलेल्या असतात. पहाटे पासून त्यावर जरा देशभक्तीपर गीतं लावली (सकाळी ९ पर्यंत की मग दिवसभर शिला की जवानी आणि तत्सम गाण्यांवर हिडीस नाच करायला सर्व कार्यकर्ते (??) मोकळे असतात. नोकरदार मंडळींची गोष्टच वेगळी. ऑफिसेस आणि प्रायव्हेट कंपन्या, बॅंका इथे ध्वजवंदन अनिवार्य नसते किंबहुना ते असतच नाही. त्यामुळे १५ ऑगस्ट हा आपली हक्काची सुट्टी आहे आणि त्याला जोडून जर शनि-रवि येणार असतील तर सोन्याहून पिवळं. मग यांचा तीन दिवसाच्या लॉंग विकएन्डचा कोणत्यातरी पर्यटन स्थळी खूप आधीपासूनच दौरा आखलेला असतो. आता आजचीच बातमी बघा ना......लोणावळा-खंडाळा हाऊस-फुल्ल आहेत. राहिले कोण तर विविध शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी. महाविद्यालयातही कागदोपत्री उपस्थिती अनिवार्य असली तरी यागोष्टी काटेकोरपणे पाळण्याइतकं मनुष्यबळ हवं ना. आणि विद्यार्थ्यांमध्ये तर महाविद्यालय म्हणजे सर्व अनिवार्यतांपासून सुटका अशीच व्याख्या असते. त्यामुळे एनसीसी, एनएसएस इ.इ. पथकं सोडली चार-दोन खेळांच्या टीम्स सोडल्या तर बाकी कोणी फिरकत नाही. मग आपापल्या मित्रमैत्रिणींबरोबर कुठल्यातरी गडावर किंवा एखाद्या पिकनिक स्पॉटवर जाण्याचा प्लॅन असतो. शाळेतल्या मुलांना-शिक्षकांना आणि बी एड महाविद्यालयांतील विद्यार्थी-शिक्षकांना तसेच प्राध्यापकांना यातून सुटका नसते. त्यामुळे हेच पब्लिक काय ते तिरंग्यासमोर झेंडावंदनाला उभं रहातं.
सध्याची एकूणच सामाजिक आणि राजकिय परिस्थीती बघता १९४७ साली स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी महात्मा गांधींनी खालील दोन गोष्टी सांगीतल्या होत्या. एक म्हणजे स्वातंत्र्य उपभोगणार्‍या समाजाचे चारित्र्य घडवायला हवे आणि दुसरं म्हणजे कॉंग्रेस विसर्जित करायला हवी. या सांगीतलेल्या दोन गोष्टी किती आवश्यक होत्या याची ्सध्याची परिस्थीती पाहून खात्रीच पटते. या दोन गोष्टींवरून  नेहरू आणि त्यांच्यात मतभेद झाले आणि नेहरूंनी महात्मा गांधींचं न ऐकता स्वत:च निर्णय घेऊन स्वतंत्र भारताला दिशा दिली. सुभाषबाबू, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा परस्पर काटा काढून नेहरूंनी त्यांना एकही मत मिळालेलं नसताना वल्लभभाई पटेलांकडून कॉंग्रेसचं अध्यक्षपद हिरावून घेतलं आणि स्वत:च पंतप्रधान सुद्धा झाले. १९४८ साली महात्मा गांधी गेले. त्यामुले नेहरूंना थांबवणारं कोणीच नव्हतं. मग त्यांना हवं तसं त्यांनी देशाला वळवायला सुरूवात केली. आपल्या देशातील मूलभूत शेती व्यवसाय, तसेच विविध खेडेगावांतील तसेच शहरांतील कुटीरोद्योग, प्राथमिक शिक्षण यांसारख्या पायाभूत गोष्टींच्या विकासाकडे दुर्लक्ष केलं. मोठमोठे कारखाने शहरांच्या आसपास उभे राहिले आणि त्याच्या आसपास कारखान्यात काम करणार्‍या खेडेगावातून आपली शेती आणि पारंपारिक कुटेरोद्योग सोडून आलेल्या गरीब कामगारांच्या वस्त्या देखिल उभ्या राहिल्या. पैसेवाल्यांसाठी उच्चशिक्षण संस्था उभ्या राहिल्या. समाजातील दरी अजुनच वाढत गेली. प्राथमिक शिक्षण योग्य त्या दर्जाचं न मिळाल्यामुळे गरीब कुटुंबातील तसेच खेडेगावातील मुलांना सुरूवातीला संधी न मिळून ते मागेच पडत गेले. यासगळ्याबरोबरच राजकिय पुढारी आणि राजकारणी लोक यांच्यामध्ये भ्रष्टाचार करून पैसे कमावण्याची सवय लागली. पुढल्या निवडणुकीत जिंकुन येण्यासाठी आवश्यक पैसा उभा करण्या मध्येच निवडुन आल्यावर नेतेमंडळी व्यग्र असायला लागली. आता तर भ्रष्टाचारांची संख्या आणि प्रमाण हे गगनाला भिडलं आहे. शासकीय यंत्रणांचा वापर सहजपणे विरोधकांना शह देण्यास केला जातो. सत्याग्रहाची आंदोलनं ब्रिटीशसरकारच्यापेक्षाही लाजिरवाण्यापद्धतीनं दडपली जातात. जो कोणी भ्रष्टाचारा विरोधात किंवा शासनाच्या विरोधात बोलेल त्यालाच भ्र्ष्टाचारी म्हणून पकडलं जातंय. जनता झोपलेली किंवा मूकी-बहिरी झालेली आहे.
यापार्श्वभूमीवर देशाच्या बॉर्डरवर सैनिक प्राणपणाने आपल्या देशाचं रक्षणकरत ठामपणे उभे आहेत. कित्येकांनी देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या जीवाचं बलिदान केलेलं आहे......करत आहेत. तरी राजकारणी लोकांना याची काहीही किंमत नाही. संसदेमध्ये स्वत: न करत असलेल्या कामाचा मोबदला तिप्पटीने वाढवायचा आणि सैन्यातील लोकांची पगारवाढ रोखून धरायची. स्वत: भ्रष्टाचाराची कोटीच्या कोटी उड्डाणं करून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटायचं. आज जरी देशाची एकाबाजूला प्रगती होताना दिसत असली तरी भ्रष्टाचार, महागाई, बॉम्बस्फोट, दहशतवाद्यांचे सशस्त्र हल्ले, गरीब-श्रीमंत यांतील दरी यांचं प्रमाणहीप्रमाण खूपच वाढलेलं आहे. हेच अपेक्षित होतं का आपल्या क्रांतिकारकांना? यासाठीच का त्यांनी बलिदान दिलं होतं? हे जे काही चालू आहे ते खरंच स्वातंत्र्य आहे की स्वैराचार? आपण स्वातंत्र्याची ६५ वर्षं साजरी करतोय की स्वैराचाराची??
पूर्वी १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं "ए मेरे वतन के लोगों,........"  ऐकताना नेहरूंच्या डोळ्यांतही अश्रू उभं राहिल्याचं ऐकीवात आहे. आता नुसतं ए मेरे वतन के लोगों ऐकू आलं तरी पुढच्या ओळी कानात आदळत असतात त्या अशा:
ए मेरे वतन के लोगों,
कितने गुंगे और बहरे हो।
इतना भ्र्ष्टाचार होनेपर भी,
तुम सारे इतने चुप क्यों हो?
तुम अपनेही आप में,
इतने मशगुल कैसे हो?

Thursday 30 June 2011

अजुन उजाडत नाही हो!!

महाजालावरून साभार
पर्वाच वर्तमानपत्रात दहावीचा निकाल लागण्या पाठोपाठ गणित अतिसामान्य केले ही बातमी वाचनात आली. आधीच गणितात कमी गुण मिळत असल्याने सामान्य आणि अवघड गणित असे दोन भाग केलेत म्हणे. त्या अवघड गणित हा विषय फक्त ३% विद्यार्थ्यांनीच घेतला. त्यांचा गणिताचा निकाल चांगला आहे. जे गणितात नापास झालेत किंवा ज्यांना कमी गुण मिळाले आहेत ते सगळे सामान्य गणित वाले आहेत. त्यामुळेच आता हे सामान्य गणित सुद्धा झेपत नाही म्हणून ते अतिसामान्य करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
सहा विषयातील बेस्ट फाईव्ह प्रकारामुळे सहाजिकच जो विषय अवघड वाटतो तसेच आवडत नाही तो विषय ऑप्शनला टाकणे हा प्रकार आहेच. त्यातून दहावीच्या परीक्षेला एटी केटी चालू केली आहे. म्हणजेच एखाद्या विषयात नापास आणि बाकी सगळ्या विषयात पास असतील तर त्यांना अकरावीला प्रवेश मिळेल आणि राहीलेला विषय त्यांनी पुढच्या वर्षभरात सोडवून घ्यायचा. अशी तयारीच असेल तर अतिसामान्य गणित सुद्धा कुणाला झेपेल असे वाटत नाही.
==================================
बी एड कॉलेजेस मध्ये गणित हा विषय पदवी पर्यंत किंवा पदव्युत्तर स्तरा पर्यंत शिकलेले विद्यार्थी जवळ जवळ नसतातच. त्यामुळे जे विद्यार्थी गणित अध्यापन पद्धती घेतात (म्हणजे गणित कसं शिकवायचं हा विषय) ते सगळे एकतर जीवशास्त्र किंवा रसायनशास्त्रवाले असतात. विज्ञान अध्यापन पद्धतीच्या जोडीला गणित घ्यावच लागतं म्हणून गणित घेणारे. स्वत:च्या विद्यार्थी जीवनात गणिताला घाबरणारे, गणिताच्या संकल्पना स्पष्ट नसणारे तसेच गणिताविषयी प्रेम, आस्था नसणारे असेच असतात. या बी एड कॉलेजेस मध्ये ज्यांनी आयुष्यात कधीही गणित शिकवलेलं नाही आणि ज्यांचा गणित विषय सुद्धा नव्हता असे अध्यापक गणित अध्यापन पद्धती शिकवतात. प्रश्न-विचारणे हा गणिताचा आत्मा आहे. प्रश्न पडल्या शिवाय आणि विचारल्या शिवाय गणित समजत नाही आणि समजावून देताही येत नाही. अचूक आणि योग्य प्रश्न विचारून एखादं उदाहरण कसं सोडवायचं ही अतिशय उपयुक्त आणि जुनी अध्यापन पद्धती आहे. पण सध्याच्या गणित अध्यापन पद्धती शिकवणार्‍या अध्यापकांना गणित शिकवताना काय प्रश्न विचारणार असाच प्रश्न पडलेला असतो आणि आपला हाच समज ते गणिताच्या भावी शिक्षकांपर्यंत पोहोचवतात. गणित आणि भौतिकशास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमात घेणारे विद्यार्थी बी एड ला कधीच येत नाहीत कारण बी एड्च्या अभ्यासक्रमात डोकं बाजूला ठेवून सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे गणित आणि भौतिकशास्त्र शिकलेले विद्यार्थी या ठीकाणी अत्यंत बोअर होतात (जर त्यांना स्वत:चं डोकं वापरायची सवय असेल तर). मग अशावेळी विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर तसेच ज्यु. कॉलेज स्तरावर गणित बर्‍यापैकी शिकवणारे शिक्षक कसे मिळणार? खरं तर विज्ञान शिकवण्याच्या बाबतीतही तीच गत आहे फक्त तिथे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्याचाच बोर्‍या वाजलेला आहे पण घोकंपट्टीमुळे विद्यार्थी त्यात पास होतात. मूलभूत संकल्पना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन कशाशी खातात हे माहीती नसतं.
====================
गेले महिनाभर जसा वेळ मिळेल तसं अच्युत गोडबोले यांनी लिहीलेलं किमयागार वाचत होते. पुन्हा एकदा विज्ञानाच्या प्रेमात पडले. गंमत म्हणजे या सगळ्या विज्ञान शाखांमध्ये गणितच वापरलेलं आहे. उगाच नाही गणिताला "सर्व विज्ञान विषयांची राणी" असं म्हणतात. सध्या बरर्टड रसेल यांच्या विषयी वाचते आहे. गणित शिकण्यात काय मजा आणि सुख आहे हे शब्दांत सांगता येणार नाही. गणितातील मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्या, जर जिज्ञासू वृत्ती, समजलं नाही तर प्रश्न विचारून ते समजून घेण्याची प्रवृत्ती, जोपर्यंत ते समजत नाही तोपर्यंत त्याचा पिछा न सोडण्याची वृत्ती निर्माण केली तर गणिताची भिती वाटण्याचं कारणच नाही. त्याचप्रमाणे वर उल्लेखलेल्या गुणधर्मांपैकी सर्वच्या सर्व इतर विषयांच्या अभ्यासात तसेच पुढच्या आयुष्याच्या दृष्टिने आवश्यक असेच आहेत. हे न होता, जर घोकंपट्टी आणि झापडबंद पद्धतीने शिकवलं तर या राणीच्या प्रेमात पडण्या ऐवजी त्या राणीचा धसका घेऊन विद्दार्थी तिच्यापासून दूर जातील. त्यामुळे आपण गणित हा विषय सामान्य आणि मग अतिसामान्य करू. पण मूळ समस्या कधीच सूटणार नाही. कारण गणित विषय योग्य व्यक्तींनी शिकवण्या ऐवजी अयोग्य अशी पाऊलं समस्या निवारणासाठी उचलली जात आहेत.
==========================
एक प्रसिद्ध वक्ते आम्हाला शिकवायला होते. त्यांचा विषय इतिहास, तत्त्वज्ञान, इंग्रजी. एकदा वर्गात व्याख्यान देताना ते इतके सुसाट सुटले की खुद्द स्वामी विवेकानंदांच्या तोंडी (त्यांचा तो अभ्यासाचा विषय आणि ते त्यावर भरपूर व्याख्याने द्यायचे) स्वामींनी कधीच न उच्चारलेले वाक्य घातले. ते म्हणाले, "गणिताचा दैनंदिन आयुष्यात काहीच उपयोग नाही. एम एस्सी गणित झालेल्यांपेक्षा  भाजीवाली शाळेत सुद्धा न जाता भाजीवालीला गणित अधिक चांगलं येत असतं. भारतातील कोणत्याच महापुरूषांनी गणित शिका असं म्हंटलं नाही. कोणत्याही महापुरूषाला गणित आवडत नव्हतं. अगदी स्वामी विवेकानंद म्हणायचे ""घणित शिकून काहीच उपयोग नाही. म्हणून मला गणित आवडत नाही."" " आता याच महाशयांचं एक व्याख्यान ऐकताना त्यांनीच दिलेलं उदाहरण मी ऐकलं होतं. "साधारण १९१६ सालची घटना आहे. लोकमान्य टिळक सर्व भारतभर लोकप्रिय होते. त्यांच्या एकूणच चळवळीमुळे इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. इंग्रजही अगदी मेटाकुटीला आले होते. एकदा सहज एका इंग्रज अधिकार्‍याने टिळकांना विचारलं की आम्ही तुम्हाला आत्ता स्वातंत्र्य दिलंत तर तुम्ही स्वतंत्र भारताचे पंतप्रधान व्हाल ना? तर लो टिळकांनी उत्तर दिलं: मी राजकारणात शिरलो ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. जळजळीत अग्रलेख लिहायला हाती घेतलेली लेखणी खाली ठेवून मी खडू हातात घेईन आणि गणिताचा शिक्षक होईन." लो. टिळकांचं गणितप्रेम जगजाहिर आहे. त्यांनी गणितावर एक-दोन ग्रंथही लिहीलेले आहेत.
=======================
रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण गणिताचाच वापर करत असतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती गणिता शिवाय अशक्यच. गणिताशिवाय संगणक युग अस्तित्त्वात येणंच शक्य नव्हतं. इतिहासातील सनावळ्या, दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहार, टिव्ही, संगणक, टेलीफोन, अत्याधुनिक उपकरणं, अगदी रोग्याला देण्यात येणारं औषध, मानवी अस्तित्त्वाचं रहस्य उलगडुन दाखवणारी डी एन ए रेणूची रचना आणि त्यातील गणितीय सूत्र त्यानुसार ठरणारे माणसाचे गुणधर्म, निसर्गातील विविध रचना यासारख्या अनेक गोष्टींत गणितच आहे. आपण जर विचार केला तर गणिता शिवाय आपण जगुच शकणार नाही अशी परिस्थीती आहे. इतकं महत्त्वाचं स्थान असलेला विषय केवळ आपल्याला आवडत नाही, आपल्याला शिकवता येत नाही म्हणून अतिसामान्य करायचा? रोगाच्या मूळापर्यंत शिरून तिथे उपचार करण्या ऐवजी वरवरची मलमपट्टी केली जाते. त्यामुळेच अजुनही गणिताचा प्रश्न सुटत नाही. कधी उजाडणार आहे समजत नाही!

महाजालावरून साभार

Friday 17 June 2011

स्टॅनली का डिब्बा!!


एक शाळकरी मुलगा एका कॉन्व्हेंट शाळेत प्रवेश करतो, मदर मेरी आणि जिझस यांच्या पुतळ्यापुढे हात जोडून वर्गात जातो याने चित्रपटाची सुरूवात होते. त्या मुलाचं नाव असतं स्टॅनली. शाळा सुरू व्हायला बराच अवकाश असल्याने वर्गात कोणीच नसतं. मग स्टॅनली थोडा राहिलेला होमवर्क करतो आणि मग बाकावरच ताणून देतो. हळूहळू शाळेत मुलं यायला सुरूवात होते. स्टॅनली संपूर्ण वर्गात सगळ्यांचा आवडता असतो तो त्याच्या मधील गुणांमुळे. शाळेच्या मधल्या सुट्टीत स्टॅनली सोडून सगळी मुलं डबा आणत. स्टॅनली मात्र वडा-पाव खाऊन येतो असं सांगून भरपूर पाणी पिऊन यायचा. इंग्लीशची शिक्षीका रोझी टीचर मुलांवर प्रेमाने बोलून त्यांच्या प्रत्येक सर्जनशीलतेला दाद देऊन मुलांना प्रोत्साहन द्यायची. याउलट विज्ञान शिक्षिका मिसेस अय्यर मुलांच्या प्रत्येक कृतीवर डोळे वटारायची. हिंदी शिकवणारे आणि संधी मिळेल तेव्हा मुलांच्या तसेच सहकारी शिक्षकांच्या डब्यात हात घालणारे खादाड वर्मा सर, स्टॅनलीला डबा न आणण्यावरून आणि मित्रांचा डबा खाण्यावरून खूप बोलायचे. स्टॅनलीच्या वर्गातील मित्र वर्मासरांना चुकवुन डबे खायचं ठरवतात आणि हेच स्टॅनलीच्या मित्रांबरोबर डबा खाण्याच्या आनंदाच्या मुळावर येतं. एक दिवस वर्मासर स्टॅनली ला सांगतात डबा नसेल तर शाळेतही यायचं नाही. स्टॅनली मग शाळेत यायचं थांबवतो की डबा आणतो? चित्रपटाच्या सुरूवातीपासूनच स्टॅनलीच्या वैयक्तीक आयुष्याबद्धल एक गूढता निर्माण झालेली असते. त्याचं रहस्य उलगडतं का? हे समजण्यासाठी स्टॅनली का डिब्बा हा चित्रपट जरूर बघावा.

लहान मुलांची बाल सुलभ मैत्री आणि आपण लहानपणापासून पहात आलेल्या विविध व्यक्तीमत्त्व असलेले शिक्षक यांचं प्रभावी चित्रण यात आहे. त्याचप्रमाणे अत्यंत नैसर्गिकरित्या सर्व चित्रिकरण केलेलं आहे. तारे जमीन पर या चित्रपटाचे लेखक अमोल गुप्ते यांनीच लिहीलेला आणि दिग्दर्शित केलेला स्टॅनली का डिब्बा समाजातील एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करून जातो. कोणत्याही संवेदनशील मनाच्या डोळ्यात हा चित्रपट पाणी उभं करतो. मागे एकदा खुपते तिथे गुप्तेमधे अमोल गुप्तेंच्या मुलाखतीत त्यांनी स्टॅनली का डिब्बा विषयी सांगीतलं होतं. एक महत्त्वाचा विषय हाताळतानाच त्यांनी एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीला एक महत्त्वाचा संदेशही दिला आहे. सध्या जिथे जिथे लहान मुलं एन्टरटेनमेंट इंडस्ट्री मध्ये काहीना काही कारणाने (म्हणजे विविध स्पर्धा, रिअ‍ॅलीटी शोज, दैनंदिन मालिका, विविध जाहिराती) काम करत असतात त्यांच्या शाळा प्रचंड बुडतात. एका एका एपिसोडचं काम ७-८ तास चाललं तर बाल कलाकारांना अक्षरश: ताटकळत बसावं लागतं. मग सेट हेच त्यांचं घर आणि खेळण्याचं ठीकाण होतं. हे सुद्धा एक प्रकारचे "बाल कामगार" च आहेत. स्टॅनली का डिब्बा मध्ये अमोल गुप्ते यांनी बाल कामगारांची समस्या अतिशय तरल आणि प्रभावीपणे मांडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. पण हे करताना चित्रपटात काम करणार्‍या बाल कलाकारांना त्यांची शाळा, अभ्यास आणि इतर उपक्रम बुडवायला नाही लागले. या बाल कलाकारांच्या नेहमीच्या आयुष्याला जराही धक्का न पोहोचवता अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात, त्या मुलांना कळु न देता अमोल गुप्ते यांनी या चित्रपटाचं शुटींग प्रत्येक आठवड्याचे फक्त शनि-रवि असे दोन दिवस कार्यशाळेला बोलावून १२-१३ आठवड्यात चित्रिकरण पूर्ण केलं. कोणत्याही प्रकारचा भव्य दिव्य सेट यात वापरलेला नाही. तरीही चित्रपटाच्या काही तांत्रिक बाबतीत प्रश्न पडतात. एक शिक्षक जर मधल्या सुट्टीत मुलांचे तसेच सहकारी शिक्षकांचे डबे विचारून किंवा चोरून खात असेल तर त्याविषयी प्रिंसीपलना काहीच कल्पना नसणे आणि शाळेमार्फत त्यावर काहीच कारवाई न होणे हे अतिशय कृत्रिम वाटते. एक शिक्षक शाळेतल्या मुलाला डबा आणला नाहीस तर शाळेत येऊ नकोस असं सांगू शकतो का? आणि जर एखाद्याने सांगीतलंच तर याचा पत्ता शाळेच्या मुख्याध्यापकांना नसावा (इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांना माहिती असूनही) हे जरा अतिरंजीत वाटतं. शाळेत येणार्‍या प्रत्येक मुलाच्या घरची पार्श्वभूमी ही वर्ग शिक्षक तसेच मुख्याध्यापक यांना माहिती असतेच. ह्या चित्रपटात ते जाणून घेण्याची कोणी तसदी सुद्धा घेत नाही अगदी शेवटपर्यंत हे खटकतं.
बाल कामगारांचा प्रश्न जरी प्रभावीपणे पोहोचवण्याचा एक चांगला प्रयत्न असला तरी शेवट कुठेतरी अर्धवट वाटतो. अमोल गुप्ते हे एक चांगले लेखक तर आहेतच पण त्याहूनही अधिक एक मानसशास्त्रज्ञ वाटतात. मुलांचं मानसशास्त्र त्यांना अगदी चांगलं उमगलेलं आहे हे चित्रपटात दिसून येतं. त्यांच्याकडून यापेक्षाही अधिक उत्तम आणि दर्जेदार चित्रपटांची अपेक्षा आहे की जे लहान मुलांचे विविध प्रश्न प्रभावीपणे मांडू शकतील. त्यांना त्यासाठी शुभेच्छा!!

Sunday 24 April 2011

दुनिया झुकती है........



दहा एक महिन्यांपूर्वीची गोष्ट. आम्ही फ्रॅंकफर्टहून लुफ्तान्साच्या फ्लाईटने बंगलोरला येत होतो. माझ्या शेजारच्या सीटवर म्युनिकहून आलेली एक जर्मन बाई बसलेली होती. मी तिला सहज विचारलं की तुम्ही भारतात कुठे आणि कशासाठी चाललायत? तर तिने दिलेलं उत्तर ऐकून मला धक्काच बसला. ती पुट्ट्पूर्तीला चाललेली होती. सत्य साईबाबांच्या ८५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जगातील वेगेवेगळ्या भाषांमध्ये त्यांची प्रार्थना गाण्याच्या आंतरराष्ट्रीय समुहातील ती एक होती. तिथे जाऊन महिनाभर राहून ते लोक त्या प्रार्थनांचा सराव करणार होते. म्युनिक मध्येच काय संपूर्ण जगभरात त्यांचे भक्तगण पसरलेले आहेत. मला खूपच आश्चर्य वाटलं. तसं पुट्टपूर्तीला सत्य साईबाबांनी विविध सेवा कार्य काढलेली आहेत, त्यांचे भक्तगण सर्वदूर पसरलेले आहेत असं ऐकीवात होतं आज प्रत्यक्ष पहायला मिळालं. 
मी जेव्हा पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीत शिकवत होते तेव्हाची गोष्ट. एकदा अध्यापक कक्षात एक साडी नेसलेली आणि प्रचंड लांबलचक असं कपाळभर कुंकु लावलेली एक व्यक्ती आलेली पाहीली. सोलापूर ज्ञान प्रबोधिनीची कार्यकर्ती होती. पण एकूण अवतारावरून तर असंच वाटत होतं की कुठल्यातरी आश्रमातून आलेली किंवा चाललेली आहे. मी नंतर चौकशी केली तेव्हा समजलं की ती पुट्टपूर्तीला कायमची रहायला चाललेली होती. मला तेव्हा सुद्धा अधिक आश्चर्य वाटलं होतं.
महाविद्यालयात द्वितीय वर्षाला असताना मी महिन्याच्या सुट्टीत मी इगतपुरीला विपश्यना शिबीरासाठी गेले होते. दहा दिवसाचं शिबीर संपवून आल्यावर वर्तमानपत्रात एक ठळक बातमी पाहिली होती. सत्य साई बाबांवर त्यांच्याच दोन भक्तांनी गोळ्या झाडून प्राणघातक हल्ला केला. गोळ्या झाडणार याची कल्पना आल्यावर बाबांनी तिथून पळ काढला आणि थोडक्यात बचावले. नुकतंच विपश्यना शिबिरात प्रवाचानात ऐकलं होतं की आपल्या मनात प्रेम असेल तर अगदी वाघासारख्या  हिंस्त्र पशुच देखील मत परिवर्तन आपण करू शकतो. मग मला प्रश्न पडला की सत्य साई बाबां सारखे चमत्कार करणारे अध्यात्मिक गुरू आणि त्यांचेच शिष्य असलेले ते हल्लेखोर मग बाबांच्या मनातील प्रेमाचा त्यांच्यावर प्रभाव कसा नाही पडला? असो. 
या हल्ल्यांच्या घटनेच्याही आधी काही वर्षांपूर्वी इंडीया टुडेच्या मुखपृष्टावर सत्य साईबाबांचा मोठा फोटो आणि ते हातातून घड्याळ काढतायत असा काहीसा फोटो पाहील्याचं आठवतंय. मी त्यावेळी बरीच लहान असल्याने इंग्रजी फारसं समजत नव्हतं पण चित्रं मात्रं खूप इंटरेस्टिंग असायची.  

पहिल्यापासूनच माझी देवावर किंवा परामात्मा या स्म्काल्पनेवर श्रद्धा आहे. पण मी अशा हातातून घड्याळे किंवा सोन्याच्या अंगठ्या, साखळ्या, अंगारे काढणार्या बुवांवर कधीच विश्वास ठेवला नाही. प्रत्येक माणसात देवत्व आहे हे सत्य साईबबांचं म्हणणं खरं असलं तरी मला मनापासून अशा एखाद्या व्यक्तीच्या भजनी लागणं कधी जमलंच नाही. मला प्रत्येकवेळी काही मूलभूत प्रश्न पडतात. १) जर सत्य साई बाबा हे शिर्डीच्या साईबाबांचा अवतार आहेत तर मग ते असे चमत्कार दाखवून इतकी सम्पत्ती कशी काय गोळा करू शकतात? कारण शिर्डीच्या साईबाबांनी चमत्कार दाखवले आणि लोकांना त्याचा प्रत्यय आला पण त्यांनी कधीच हातातून भौतिक गोष्टी काढल्यानाहीत. नरेंद्र दाभोळकर किंवा जादूगार रघुवीर यांना सुद्धा हातचलाखी दाखवून हातातून घड्याळ, सोन्याची साखळी, अंगारा, कुंकू काढता येतात. मग हीच त्यांची आध्यात्मिक शक्ती कशी? 
२) स्वत:च्या मनातील प्रेमाने त्यांनी त्यांच्यावर हल्ला करणार्या भक्तांच्या मनात प्रेम का नाही भरले? मग त्यांच्यावर हल्ला झालाच कसा? 
३) चमत्कारांनी जर इतरांची दुखणी बरी केली तर मग स्वत:चं आजारपण का नाही बरे करू शकले? 
सत्य साईबाबांनी नंतरच्या काळात निर्माण केलेली सेवा कार्ये हे एक उल्लेखनीय कार्य नक्कीच आहे. पण मग त्याच बरोबर भोंदू पणा करून लोकांना फसवणे कितपत योग्य आहे? अगदी मोठमोठे राजकीय नेते , मोठमोठे उद्योगपती (की ज्यातील 95% हून अधिक भ्रष्टाचारी आहेत) असे सर्वच जन बाबांचे भक्त. मग या लोकांच्या भ्रष्ट मानसिकतेत का नाही फरक पडत? मग सत्य साई बाबांनी आपल्या हातातून सोन्याच्या साखळ्या काढून देशावरील कर्जाचा बोजा का नाही कमी केला?
माणसाला मानसिक आधार म्हणून परमेश्वर, देव अशा संकल्पना लागतात. परमेश्वर, त्याचं  अस्तित्त्व हे मी सुद्धा मान्य करते पण त्या श्रद्धेत डोळसपणा  आहे. उगाचच एखाद्याच्या मागे जनता धावतेय म्हणून आपणही धावा असं करू नये. जग जितकं आधुनिक बनत चालंय तितकीच या बुवाबाबांच्या भजनी लागलेल्यांची संख्या भरमसाठ वाढते आहे. सामान्य जनतेचं जाउदेत लोक शास्त्रज्ञ म्हणून काम करतात पण नवस बोलायला शिर्डीला जातात. हा काय प्रकार आहे मला सुद्धा समजलेलं नाही. मग त्या शास्त्रीय ज्ञानाला काय अर्थ? म्हणतात ना दुनिया झुकती है.....झुकाने वाला चाहिये 

Sunday 17 April 2011

भारताची उर्जेची गरज: रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस!!

बरेच महिने झाले कोकणात जैतापूर प्रकल्प व्हावा की न व्हावा हा विषय उपयुक्त चर्चा न होता फक्त राजकीय कलगी-तुर्‍यांनी रंगलेला आहे. जपानमधील भूकंपाने फुकुशीमा (जगातील सगळ्यात मोठी अणुभट्टी) अणुभट्टीला पोहोचलेला धोका आणि त्यामुळे जैतापूर प्रकल्पाच्या चर्चेला मिळालेला एक वेगळा आयाम. अणुप्रकल्पाच्या बाजूने कंठशोष करणारे अणुशास्त्रज्ञ, सत्ताधारी आणि स्थानीक राजकीय नेते तर प्रकल्पाच्या विरोधात बोलणारे पर्यावरण प्रेमी, विरोधी पक्ष तसेच ज्यांची शेती यात संपादन केली जातेय असे  आणि इतर स्थानिक यांची प्रतिक्रीया आणि एकूण चर्चा पाहता मूळ मुद्द्याला फारसा कोणी हात घालत नाहीये असंच वाटतं. सत्ताधारी आणि अणुशास्त्रज्ञांकडून असं चित्रं निर्माण केलं गेलंय की जैतापूर प्रकल्पाला विरोध म्हणजे विकासाला विरोध. पण प्रकल्पाच्या मूळ गरजे विषयी काहीच भाष्य नाहीये.
आता अगदी आपल्या डोळ्यासमोर असलेलं उदाहरण जे सोयीस्कररित्या विसरलं जातंय: गुजरात मधील प्रत्येक गावात चोवीस तास वीजपुरवठा आहे. तिथे कोणताही अणुउर्जेचा प्रकल्प आणून बसवलेला नाहीये. अणुउर्जा नसल्याने तिथल्या विकासाला खीळ बसलेली नाही. जर आपण बघितलं तर तिथे वायू उर्जा आणि सौर उर्जा यांचा अधिक वापर केला गेला आहे. त्याचप्रमाणे जी वीज पारंपारीक उर्जा स्त्रोतांतून मिळते आहे म्हणजे कोळश्याचा वापर करून तिचा अधिकाधीक सदुपयोग केलेला आढळतो. मुख्य म्हणजे गुजरात मधली वीज चोरी ९५% थांबलेली आहे. आपल्याकडे निसर्गाला अपाय न करता अशाप्रकारे उपल्ब्ध उर्जेचा अधिक वापर करून घेणं का जमत नाहीये? खाली विविध उर्जा स्त्रोतांसंदर्भात काही माहीती आणि मतं मांडते आहे.

अणुउर्जा

एकूणच जागतिक पातळीवर अणुउर्जेचा वापर आणि उर्जेची गरज भागवण्याचं प्रमाण पाहता अणुउर्जेच्या वापराची टक्केवारी ६ ते ८ % च्या वर जात नाही. त्याउलट अणुउर्जा प्रकल्पांना येणारा खर्च, त्यांच्या सुरक्षेसाठी येणारा खर्च (सुरक्षा अपुरीच असणार), त्यातून निघणार्‍या न्युक्लीअर वेस्टचं प्रमाण, त्याचे स्थानीक जनजीवनावर होणारे अपायकारक परिणाम बघता अणुउर्जा प्रकल्प भारतासारख्या देशाला आतबट्ट्याचा व्यवहार ठरेल.
बायोमास उर्जा: ब्राझील सारखं आपल्या देशात बायोमास म्हणजे ऊसापासून इथेनॉल मिळवुन त्याचा वापर इंधन म्हणून करणं अतिशय चुकीचं ठरेल. कारण ऊसासारखं पीक घेण्यासाठी लागणारं पाण्याचं प्रमाण, त्याला लागणारी मेहनत (यात ऊसकामगारांचे ही प्रश्न आलेच) तसेच त्याने कमी होत जाणारा जमीनीचा कस हे सगळं पाहता आपण गाड्या चालवण्यासाठी शेतीचं किंवा पिण्याचं पाणी वापरण्यासारखं असेल. आपली आर्थिक व्यवस्था काहीप्रमाणात साखरेवर अवलंबुन आहे आणि आपन उत्तम प्रतिची साखर निर्यात करतो. जर ऊसाच्या मळीचा वापर साखर तयार करण्यासाठी न करता इथेनॉल तयार करण्यासाठी केला तर आपल्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा भयंकर परिणाम होईल.

कोळशापासूनची उर्जा: आपल्याकडे पारंपारीक उर्जास स्त्रोत आहे तो कोळशापासून उर्जा निर्मीतीचा. त्यामुळे ठीकठीकाणी कोळशाच्या खाणी आपल्याला आढळतात. कोळशाच्या खाणींमधुन कोळसा उपसोन काढणं तब्येतीला खूपच हानीकारक आहे. आज मितीला भारतात कोळशाच्या खाणींमध्ये काम करणार्‍या कामगारांमध्ये १५ वर्षांखालील मुलांचं प्रमाण प्रचंड आहे. आपल्याच बांधवांच्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी ही मुलं दिवस-रात्र काम करून आपल्या जीवाची पर्वा न करता स्वत:च्या आयुष्यात अंधार  आणत असतात. याचाही विचार गांभिर्याने व्हायला हवा.

थर्मल उर्जा: कित्येक टन लाकूड जाळून जी उर्जा मिळते ती थर्मल एनर्जी. यासाठी आपली सुंदर हिरवीगार जंगलं प्रचंड प्रमाणात तोडली जात आहेत. ज्याप्रमाणात जंगलतोड होते आहे त्याप्रमाणात वृक्षलागवड होत नाहीये. जंगल तोडीमुळे पर्यावरणाची अपरीमित हानी होते आहे त्याविषयी गांभिर्यानं विचार करायला हवा.
तेल आणि नैसर्गिक वायू पासून मिळणारी उर्जा: आपल्याकडे आता थोडेफार तेलाचे साठे तयार होत आहेत पण आपली गरज कित्येकपटीने वाढते आहे. त्यामुळे आपल्याला आपली तेलाची गरज भागवण्यासाठी आखाती देशांकडून तेल विकत घ्यावं लागतंय. एकूणच तेलाच्या जागतिक राजकारणामुळे तेलाचे भाव गगनाला भिडत आहेत. आपल्याकडील सगळं परकीय चलन केवळ तेल खरेदी करण्यात खर्ची पडतंय. यामुळे आपल्याकडचे तेलाचे भाव आणि पर्यायाने महागाई प्रचंड वाढली आहे. आपल्या देशातील अव्यवस्था आणि असलेले रीसोर्सेस व्यव्स्थीत न वापरणे त्याउलट त्याचं शोषण होत असल्याने आपल्याकडे शहरी भागात प्रदुषणाचा प्रश्न आवासून उभा आहे. 


जरी जागतीक टक्केवारी असं सांगत असली की भारतात हवेत कार्बन सोडण्याचं प्रमाण हे अमेरिका, कॅनडा, युरोप आणि चीन यादेशांच्या तुलनेत खूपच कमी असलं तरी आपण आपली लोकसंख्याही लक्षात घ्यायला हवी. त्याचप्रमाणे आपल्याकडील उद्योगांचे प्रमाणही त्यांच्याकडील उद्योगांच्या तुलनेत कमीच आहे. पण आपण वेळीच जागे झालो नाही तर वाढत्या उद्योगांबरोबर आपण आपल्या पर्यावरणाचा र्‍हास करून आपली कबर खणू.
कोळशापासून बनवलेल्या उर्जेमुळे, कोळशाच्या खाणीत काम करणार्‍या कामगारांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. बायोमासच्या वापरामुळे सुद्धा प्रचंड सामाजिक आणि कृषीप्रधानतेमुळे आर्थिक प्रश्नांना सामोरं जावं लागेल. अणुउर्जा, लाकूड आणि तेलापासून मिळणार्‍या उर्जेमुळे पर्यावरणाचा प्रचंड र्‍हास होतोय, प्रदुषण वाढतंय. याला भारतासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे रिन्युएबल उर्जा स्त्रोत वापरणं. म्हणजेच निसर्गाच्या चक्रातून उर्जा घेऊन ती वापरून परत निसर्गालाच परत करणे (म्हणजे निसर्गाचा र्‍हासही होणार नाही).

वायू उर्जा

आपल्याकडे वारा वाहण्याचं प्रमाण प्रचंड आहे. जिथे जिथे सपाट भूप्रदेश आहे तिथे तिथे वायू उर्जेचे प्रकल्प उभारून तिथली स्थानिक विजेची गरज भागवली जाऊ शकते. असे अधिकाधिक प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. त्यातून वीज निर्मिती होतच राहते आणि प्रदुषणही होत नाही.
पाण्यापासून उर्जा
आपल्याकडे डोंगराळ भागात (विशेषत: हिमालय, अरूणाचल प्रदेश, नागालॅन्ड, मणीपूर, मेघालय, मिझोराम) प्रचंड प्रमाणात पाण्याचे साठे आहेत. या पाण्याच्या साठ्यांमुळे वर्षांतून दोनदा  उत्तरपूर्वेतील राज्यांत, आसाम, बिहार आणि प. बंगाल मध्ये पूर येतात आणि सगळं पाणी वाया जातं. बरं मालमत्ता आणि मनुष्यहानी होते ती वेगळीच. दूर दृष्टीने विचार केला तर हे पाणी हायडल पॉवर च्या माध्यमातून वापरलं जाऊ शकतं. जर यापाण्याचा पुरेपुर उपयोग केला तर संपूर्ण भारताला वर्षंभर पुरून इतर शेजारील देशांना निर्यात करता येईल इतकी वीज निर्माण या पाण्यापासून होऊ शकते. जर व्यवस्थीत नियोजन करून, अतिशय टिकाऊ अशी हायडल पॉवर स्टेशन्स बांधायला हवीत, जेणे करून उत्तर भारत, पूर्व भारत आणि मध्य-पश्चिम भारत यांची वीजेची गरज व्यवस्थीत भागवली जाईल. स्थानीक नैसर्गिक आव्हानांना लक्षात घेऊन इनोव्हेटीव्ह सोल्युशन्स तयार करायला हवीत. यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही आणि पूरांमुळे दरवर्षी होणारं नुकसान वाचेल. अविकसित भाग विकसीत व्हायला मदत होईल.
टायडल एनर्जी आणि समुद्राच्या पाण्यापासून उर्जा निर्मिती

वारंवार येणार्‍या त्सुनामी लाटांमुळे आपल्याला आता समुद्राच्या लाटांची शक्ती चांगलीच माहीती झाली आहे. याच लाटांच्या शक्तीचा उपयोग समुद्राच्या तळाशी टर्बाईन्स लावून ती फिरवुन उर्जा निर्मीतीसाठी केला जाऊ शकतो. आपल्या देशाला नशीबने अर्ध्याअधिक भागाला समुद्र किनारा लाभलेला आहे. तिथे आपल्या हद्दीत जर समुद्रीलाटांपासून वीज निर्मिती करण्याचे प्रकल्प उभे केले तर समुद्री जीवनाचाही र्‍हास न होता उत्तम प्रकारे वीज निर्मिती होईल.

सौर उर्जा: सूर्य आपल्याला जीवन देतो त्याच प्रमाणे उर्जा देखिल देतो. खरं तर सूर्यामध्ये जी उर्जा निर्मिती होते ती प्रचंड प्रमाणात घडत असलेल्या हायड्रोजन बॉम्ब्सच्या स्फोटांमुळे म्हणजे एकप्रकारे ती अणु उर्जाच आहे. पण सूर्य आपल्यापासून कित्येक करोडो करोडो किलोमीटर दूर असल्याने त्य रेडीएअशन्सचा आपल्यावर विपरीत परिणाम होत नाही. इतकी योजनं दूर असूनही आपल्याला सूर्यप्रकाशातील दाहकतापण जाणवत असते. सौर उर्जेचे मोठमोठाले प्रकल्प उभारणे हे कितीही महागडे असले तरी सौर उर्जे शिवाय आपल्या देशाला तरी उत्तम पर्याय नाही. कारण वर्षातले फक्त चार महिने जेमेतेम आपल्याकडे पावसाळा असतो. त्यातून सध्या पावसाचं प्रमाण कमी होऊन उन्हाळा सगळीकडे वाढला आहे. देशात कमी पाऊस पडणारे किंवा दुष्काळी असे अनेक जिल्हे आहेत. की जिथे पाण्याअभावी आणि प्रखर सूर्यप्रकाशामुळे पिकं नाश पावतात. या येवढ्या मोठ्या प्रमाणात उपल्ब्ध सौर उर्जेचा उपयोग भारताने करून घ्यायचा नाही तर काय अमेरिका करणार आहे? अमेरिकादी युरोपीय देशात, त्याच प्रमाणे चीन मध्येही बघीतलं तर भारतात वर्षंभर जितकी सौर उर्जा उपल्ब्ध आहे तितकी कुठेच नाही. त्यामुळे त्यांना अणु उर्जा, तेल यांच्याशिवाय पर्याय नाहीये. पण आपल्याकडे निसर्गाचं वरदान भरपूर आहे. गरज आहे ती फक्त सुव्यवस्थित नियोजनाची.
या नियोजनासाठी काही उपाय:
१) सौर उर्जा प्रकल्पांसाठी अधिक पैसा लागतो पण एकदा केलेली गुंतवणुक कायमस्वरूपी असल्यासारखी असते. मोठमोठाले खर्चिक सौर उर्जांचे प्रकल्प बांधण्यापेक्षा वेगवेगळ्या ठीकाणी स्थानिक गरजेनुसार छोटी छोटी सौर उर्जेची युनीट्स उभारली तर उत्तम होईल.
 2) त्याचं आर्थिक गणितही व्यवस्थित जमवता येईल. मोठमोठ्या कंपन्यांना, उद्योगांना कारखाने उभारण्यासाठी लागणारी जमीन सबसीडीने देतानाच तिथल्या स्थानीक गरजेचा सौर उर्जा प्रकल्प उभारण्यास सांगणे. त्या प्रकल्पाचा सर्व खर्च हा ती कंपनी उचलेल. म्हणजे लागणारी सगळी उर्जा स्वखर्चाने निर्माण करता येईल. त्याचा बोजा सरकारवर पडणार नाही. 
3) मोबाईल टॉवर्स उभारण्यासाठी परवानगी देताना सुद्धा अशाच प्रकारे धोरण ठेवावे. म्हणजे अधिकाधिक खेड्यांत वीज पोहोचेल. 
4) शहरात प्रत्येकाला घर बांधताना किंवा बिल्डींग बांधताना भविष्यात लागणार्‍या विजेसाठी गरजे प्रमाणे सौर पट्ट्या बसवणे बंधनकारक करावे. मुख्यत: जे मॉल्स आणि दुकानदार रात्रंदिवस वीजेचा अपव्यय करतात त्यांना सुद्धा सौर उर्जेच्या पट्ट्या बसवणे बंधनकारक करावे. म्हणजे त्यांना सरकारी खर्चातून अत्यंत कमी वीज जास्त दराने पुरवावी. म्हणजे त्यांचा विजेचा अपव्यय कमी होईल. 
5) शहरी भागांत सगळ्या बिल्डींग्जना सौर पट्ट्या घालून घेणं अनिवार्य करावं. रस्त्यावरच्या प्रत्येक दिव्याच्या युनीट्स वर एक एक और पट्टी बसवावी. 
 6) डोंगराळ भागात जिथे हायडल पॉवर शक्य आहे तिथे ते प्रकल्प उभारावेत. सागरी किनारपट्टीच्या भागात टायडल एनर्जी प्लांट्स उभे करावेत. सपाट भूप्रदेशात आणि जिथे वार्‍याचं प्रमाण प्रचंड आहे तिथे वायू उर्जेचे प्रकल्प उभारावेत. अशा विविध प्रकारे स्थानिक उर्जेची गरज भागवावी. अगदीच इमर्जन्सी साठी कोळसा, थर्मल आणि तेल या उर्जांचा वापर करावा.
7) सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे वीज चोरी पूर्णपणे थांबवावी. 

म्हणजे आपल्या देशाची वीजेची गरज आपल्याला अणु उर्जा प्रकल्पांसारख्या अतिशय घातक प्रकल्पांशिवाय भागवता येईल. विकासालाही खिळ बसणार नाही. कारण खेडोपाड्यांत, कानाकोपर्‍यांत वीज पोहोचल्याने लोकांचं शहरात होणारं स्थलांतर कमी होईल आणि शहरांवर वाढणारा बोजा, बकालपणा, गलिच्छपणा कमी होईल. निसर्गाचा र्‍हास टळल्याने, प्रदुषण कमी झाल्याने देशातील स्वच्छ हवेचं प्रमाण द्विगुणीत होईल. आपला देश सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागायचा नाही. हे सुंदर स्वप्न साकारण्यासाठी गरज आहे ती इच्छा शक्तीची, भ्रष्टाचारमुक्त व्यवस्थेची. रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसची.

Friday 8 April 2011

कोंबडा आरवला आता उजाडलं तर ठीक नाहीतर.....


परवापासून इंडीया अगेन्स्ट करप्शन या चळवळीने जोर धरला आणि बघता बघता समर्थकांचा २ लाखाचा टप्पा पूर्ण केला. अण्णांना सर्व देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. मी सुद्धा अण्णांना सायबर पाठींबा जाहीर केला आणि इतरांनी तसे करावे यासाठी प्रयत्नही केले. पण......आता कुणी म्हणतील की हीला चांगलं बघवत नाही किंवा संशयीच वृत्ती जास्त. काय करणार, स्वामी विवेकानंद वाचल्यापासून कोणतीही गोष्ट जशीच्या तशी स्विकारू नये, बुद्धीच्या जोरावर तावून सुलाखून घ्यावी हेच शिकले. त्यामुळे कोणतीही गोष्ट एका बाजूने चालू असताना याला दुसरी कोणती बाजू असेल काय आणि का हे तपासण्याची सवयच लागलेली आहे. तर आपण आजच्या अण्णा हजारे प्रकरणाच्या सांगते कडे वळूया. 

आता हेच बघा ना, २-जी पासून आदर्श, गुलमोहर आणि कित्येक अशी भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस येऊन किती तरी काळ लोटला. रामदेवबाबांनी त्या विरूद्ध आंदोलनही छेडलं होतं. पण गंमत अशी की तेव्हा अण्णा हजारें सकट कोणाच्याच प्राधान्यक्रमावर भ्रष्टाचार विरोध नव्हता. त्यामुळे कोणीच (आपण सायबर वाल्यांनी सुद्धा) रामदेवबाबांना पाठींबा जाहीर केला नाही. सगळेच झोपले होते. आता अचानक गुढीपाडव्यापासून अण्णा हजारे उपोषणाला बसले आणि सगळे खडबडुन जागे झाले.
मग मला सांगा की रामदेवबाबांनी जेव्हा एक महिन्यापूर्वी भ्रष्टाचारा विरोधात रणशिंग फुंकलं होतं तेव्हा अण्णा हजारे आणि कोणाचेच प्राधान्यक्रम भ्रष्टाचार विरोध हे नव्हते का? आदर्श सकट भ्रष्टाचाराची सगळी प्रकरणे उघडकीस येऊन बराच काळ लोटलाय. रामदेवबाबांनी चालू केलेली चळवळ चुकीची होती म्हणून त्यांना पाठींबा दिला नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? तेव्हा अण्णा हजारे कुठे होते? त्यांची प्रतिक्रीया कुठेच दिसली नाही. आता एकदम ..........म्हणून जरा शंका आली. आपल्या देशात काहीही होईल....सांगता येत नाही.
मला तर असं वाटतंय की हा सगळा कॉंग्रेसचाच बनाव आहे. रामदेवबाबांना मागे टाकण्यासाठी. रामदेवबाबा आणि बाकी सगळे पटणे महाकठीण. त्यातल्यात्यात अण्णा बरे......आपला जुनाच माणूस. कारण अण्णा हजारे १० हून जास्त वर्षं महाराष्ट्रात भ्रष्टाचारा विरूद्ध (??) लढा देत आहेत. आणि जर त्यांच्यात खरंच इतकी ताकद असती तर महाराष्ट्रात एकही भ्रष्टाचाराचं प्रकरण होता कामा नये. त्या उलट महाराष्ट्रातील भ्रष्टाचार दिवसेंदिवस शिगेला पोहोचलाय. अण्णा हजारे कॉंग्रेसच्या हातातलं बाहुलं तर नाहीत? शरद पवारांची वेगळी ओळख करून द्यायला नको. महाराष्ट्रातील भूखंडांचं श्रीखंड गेली अनेक वर्षे चाटत आहेत. हे केंद्रीय कृषीमंत्री असल्यापासून महाराष्ट्रातच शेतकर्‍यांनी प्रचंड संख्येने आत्महत्त्या केल्यात. शरद पवार हा माणूस काही इतक्या नाजूक कातडीचा नाही की अण्णा हजारेंनी आरोप करायला आणि त्यांनी लगेच खुर्ची सोडून द्यायला. नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय.
दिल्लीतच पाणी मुरतंय. तुम्ही मारल्या सारखं करा आणि आम्ही रडल्यासारखं करतो. असंच काहीसं नाटक दिल्लीत चालू होतं. असं असतं तर इतर कुणालाच त्यांनी (त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी) आजूबाजूला फिरकु दिलं नाही. रामदेवबाबांनी जेव्हा आंदोलन छेडलं तेव्हा अण्णा कुठे होते? आपल्याकडे इतरांचं अनुकरण करण्याची इतकी वाईट फॅशन आहे ना. अनुकरण करणं चांगलं पण ते समजुन केलं तर. ट्युनिशीयात जे झालं ते उस्फूर्तपणे झालं. माझ्याकडे फर्स्ट हॅन्ड इन्फरमेशन आहे. पण इजिप्त आणि लिबियात जाणून बुजुन अमेरिकेने सगळं घडवुन आणलं आहे. हे सुद्धा कालांतराने विकीलिक्स मधून बाहेर येईलच. ट्युनिशीयात झालं आणि इजिप्त मध्ये झालं (की घडवलं गेलं) म्हणजे लगेच भारतात पण असं काहीतरी होऊ शकतं हे दाखवण्याची एक खुमखुमीच लोकांमध्ये पसरलेली होती. त्याचाच परिणाम म्हणजे फेसबुक इत्यादी सोशल नेटवर्कींगचा उपयोग केला गेला. सगळेच अण्णा अण्णा म्हणतायत मग आपणही म्हणूया.....आपण का मागे रहा. आणि मग सगळं पसरत गेलंय. जर हे आंदोलन खरंच असेल तर सर्व भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा लवकरात लवकर झाली पाहीजे. नरेंद्र मोदी उपोषणाला नाही बसले. कृती करून दाखवली. गुजरातमध्ये भ्रष्टाचार तुलनेने शून्यावर आला आहे.
अगदी खरंय, कोंबडा आरवला ....मग तो कोणाचा का असेना.......उजाडलं तर ठीकच. पण आपल्याकडे म्हण आहे नं, झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचं सोंग घेतलेल्याला नव्हे. आपल्याकडे जनतेची स्मृती इतकी वाईट आहे की सगळ्या गोष्टी लगेच विसरून जातात. भावना अशा प्रकारे चेतवणं तसं सोपं काम आहे त्या तशाच तेवत ठेवणं आणि प्रत्यक्ष बदल घडवुन आणणं महामुश्कील. ज्यांना सीबीआय सारख्या संघटनेला स्वत:च्या खिशात घालता येतं त्यांना लोकपाल अध्यक्षपदी असणार्‍या निवृत्त न्यायाधीशांना खिशात घालणं कितीसं अवघड आहे?
म्हणूनच म्हणावसं वाटतंय: आता कोंबडा तर आरवला ......उजाडलं तर ठीकच .....नाही तर??


Tuesday 5 April 2011

डब डब डब २०११


डब डब डब म्हणजेच WWW. सर टिम बर्नर्स ली यांनी आंतर्जाल म्हणजेच ज्याला आपण वर्ल्ड वाईड वेब म्हणतो ते शोधून काढलं आणि त्यानंतर याच आंतर्जालाच्या अधिकाधिक सदुपयोगासाठी, जगातील विविध संशोधकांना त्यात  सहभागी करून घेण्यासाठी म्हणून टिम बर्नर्स ली आणि त्यांच्या इतर सहकार्‍यांनी डब डब डब आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स चालू केली. ह्या वर्षी या कॉन्फरन्सला २० वर्षं पूर्ण झाली. गेल्या १९ वर्षांत जगाच्या पाठीवरील अनेक लहान-मोठ्या देशांत ह्या कॉन्फरन्सचं आयोजन झालं. लवकरच या कॉन्फरन्स मध्ये इंडस्ट्री आणि ऍकॅडेमिया यांचं एक सुरेख कॉम्बो तयार झालं. २००३ पासूनच या कॉन्फरन्सच्या भारतातील आयोजनासाठी, ट्रीपल आय टी (बंगलोर आणि हैद्राबाद), आय आय टी मुंबई आणि भारतातील इतर निवडक तंत्रशिक्षण संस्था, बोली लावून होत्या. ह्या कॉन्फरन्सचं यजमानपद देण्यासाठी नेमके कोणते निकष लावले जातात ह्याची कल्पना नाही पण या यजमानपदाने सलग दोन वेळा हुलकावणी दिल्यावर तिसर्‍यांदा हैद्राबाद येथे २०११ साली ही कॉन्फरन्स आयोजित करण्यासाठी परवानगी मिळाली. तसं आपल्या भारतात अशा जागतिक कीर्तीच्या कॉन्फरन्सेस होणं हेच खूप अपरूप असतं. कारण अधिकाधिक भारतीय विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येतं. तसे आय आय टी मधील विद्यार्थ्यांनी/संशोधकांनी  या कॉन्फरन्स मध्ये आपापले पेपर्स या आधीही वाचले असतील पण एखादा पेपर वाचणे हा अनुभव वेगळा आणि अशी कॉन्फरन्स आयोजित करणे हा अनुभव वेगळा. त्या दृष्टीने तसेच भारतासारख्या ७०% जनता खेड्यात राहणार्‍या विकसनशील देशांत या महाजालचा उपयोग विकास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कसा करता येईल म्हणजेच "सगळ्यांसाठी वेब" ही थीम केंद्रस्थानी ठेवून ही कॉन्फरन्स २०११ साली भारतात आयोजित करण्याला खूप महत्त्व आहे. वेब टेक्नॉलॉजीशी संबंधीत अतिशय महत्त्वाचे असलेले विषय या कॉन्फरन्स मध्ये अभ्यासले जातात. आंतर्जाल म्हंटलं की त्याचा दुरूपयोग आणि मग ओघनेच त्याची सुरक्षा, त्यातील प्रायव्हसी जपणे हे ओघाने आलेच. वेब टेक्नॉलॉजीचा सर्च सिस्टीम्स आणि त्याची ऍप्लीकेशन्स हा एक अविभाज्य भाग. याच आंतर्जालावर अनेक प्रकारची माहीती विविध स्वरूपांत साठवलेली असते. त्या माहीतीचं सुयोग्य संकलन, त्याचा सुयोग्य वापर करण्यासाठी त्याची क्रमवारिता लावणे (रॅंकींग), स्ट्रक्चर्ड डेटा आणि अन्स्ट्रक्चर्ड डेटा यांना जोडणे, त्याचप्रमाणे यासगळ्याचा वापर करणारे म्हणजे आपण (युजर्स), आपल्याला त्याच अधिकाधिक वैयक्तीक दृष्ट्या (पर्सनलाईझ्ड) वापर कसा करता येईल, वेब टेक्नॉलॉजीचा मोबाईल सिस्टीम्स मधला वापर, सोशल नेटवर्कींग, त्यातून मिळणारी समजाच्या तसेच व्यक्तींच्या वर्तना विषयीची माहीती, त्याचा भविष्यात करून घेता येण्यासारखा उपयोग, मॉनेटायझेशन यांसारखे विषय जसे यात हाताळले गेले तसेच सीमॅन्टीक वेब टेक्नॉलॉजी की ज्याला वेब ३.० असे म्हणतात की जी भविष्यातील वेब टेक्नॉलॉजी कशी असेल आणि विकसनशील देशांसाठी वेब टेक्नॉलॉजी असे सुद्धा विषय चर्चिले गेले. एकूणच कोणत्याही ज्ञान शाखेतील माहीतीच्या विस्फोटामुळे त्या त्या शाखांची व्याप्तीही प्रचंड वाढली आहे त्यामुळे .....देता किती घेशील दो कराने........अशीच अवस्था होते. यामुळेच कॉन्फरन्स मधील संशोधनाविषयी या लेखात मी फारसं काही लिहीलेलं नाही. आवश्यक तिथे थोडीशी ओळख मात्र दिलेली आहे. 
जानेवारीत कॉन्फरन्सची वेबसाईट चाळत असताना एका महत्त्वाच्या गोष्टीने लक्ष वेधले आणि ते म्हणजे फेलोशीप्स. कॉन्फरन्सला जाण्यासाठी गुगलने पी एच डी किंवा मास्टर्स करणार्‍या मुली/स्त्रिया यांच्यासाठी फेलोशीप ठेवली होती. त्यासाठी मी अर्ज केला. १५ दिवसांनी मला ती फेलोशिप मिळल्याचं पत्र आलं आणि माझं डब्ल्यु ३ कॉन्फरन्सला जायचं नक्की झालं. कॉन्फरन्स रजिस्ट्रेशन फी, टू स्टार मध्ये राहण्याची सोय आणि जाण्यायेण्याचं विमान प्रवास असं सगळं त्या फेलोशिप मध्ये होतं. पी एच डी करताना अशा उत्तम कॉन्फरन्स अटेंड करणं, विविध कॉन्फरन्सेस मध्ये पेपर प्रेझेंट करणं हा अनुभव खूप महत्त्वाचा मानला जातो. त्या विषयातलं तसेच त्या क्षेत्रातलं ज्ञान अद्ययावत आणि वृद्धिंगत होण्यासाठी तसेच त्या क्षेत्रातील जगभरातील संशोधकांना भेटता येणं, त्यांच्याशी संपर्क प्रस्थापीत करणं यासाठी हे अनुभव खूप मोलाचे असतात.  कॉन्फरन्स २८ मार्च पासून चालू होणार असल्याने २७ तारखेलाच फ्लाईटने संध्याकाळी हैद्राबादला पोहोचले. इन्फोसीस गेस्ट हाऊस मध्ये सगळ्या फेलोशिप होल्डर्सची राहण्याची सोय केली होती. माझ्या रूम मध्ये राज्यक्रांतीमुळे नुकत्याच प्रकाश झोतात आलेल्या ट्युनिशीयाहून आलेली एक संशोधक होती. तिच्या बरोबर झालेल्या गप्पांवर  एक स्वतंत्र लेख लिहेनच.  सुरूवातीला म्हणजे २८ आणि २९ मार्च या दिवशी विविध विषयांवर कार्यशाळा आणि ट्युटोरियल्स होत्या. मला ही पद्धत आवडली. कारण त्यामध्ये इन्फॉर्मल कम्युनिकेशनला भरपूर वाव होता. तसेच विविध विषयांतले तज्ज्ञमंडळी तीथे असल्याने त्यांच्याशी मनमोकळी चर्चा करणं, त्यांची ओळख करून घेणं याला भरपूर वाव मिळाला. ३० मार्चला आपले माजी राष्ट्रपती रॉकेट सायन्टीस्ट डॉ ए पी जे अब्दुलकलाम उद्घाटन करण्यासाठी आले होते.  कॉन्फर्न्स उद्घाटनाची सुरूवात जपानमधील त्सुनामी मध्ये बळी गेलेल्या नागरिकांना श्रध्द्दांजली वाहून झाली. अब्दुल कलामांसारखी भविष्यवेधी व्यक्ती "सर्वांसाठी वेब" या थीमवरील कॉन्फरन्सचं उद्घाटन करायला मिळणं हा सुद्धा एक दुग्ध-शर्करा योगच म्हणायचा. वेब टेक्नॉलॉजीचा भारतात प्रसार होताना भारतीय संस्कृती जपून, स्थानिक लोकांच्या गरजांनुरूप त्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यासंदर्भात डॉ. कलाम यांनी आपले विचार मांडले. याच विषयावरील विविध पॅनेल डीस्कशन्स मधुन याहू, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट यासारख्या मोठमोठ्या कंपन्या नक्की कोणतं संशोधन करतायत, काय काय नविन आणू पहात आहेत यावरही चर्चा झाली. विविध सोशल नेटवर्क साईट्सचा एकूणच मानवी आणि सामाजिक वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी उत्तम उपयोग करता येऊ शकतो आणि तसा तो करणं चालू आहे असंही याचर्चां मधून बाहेर आलं. माणसाची सामाजीकरणाची गरज भागवण्यासाठी तयार झालेल्या या सोशल नेटवर्कींग साईट्स हळूहळू ज्ञान संपादन, माहीतीची देवाणघेवाण याबरोबरच समाजातील राजकीय भान कसे जागृत करतेय याचीही जाणीव करून गेले. त्याअनुषंगाने विविध देशांतील इंटरनेट सेवा पाहीजे तेव्हा बंद करण्याच्या तेथील शासकीय कायद्यांचा जागतिक पातळीवर, युनो मध्ये पुनर्विचार व्हावा असाही विचार या चर्चांमध्ये व्यक्त करण्यात आला. एकूणच भारतातील दूरदर्शनचा प्रचंड वापर पाहता मायक्रोसॉफ्टने भारतातील खेडोपाड्यात जिथे इंटरनेट कनेक्टीव्हीटी मिळत नाही तिथे वेबवर उपल्ब्ध असलेले शैक्षणिक साहित्य एका हार्ड डीस्क मध्ये साठवुन टीव्हीच्या माध्यमातून घराघरात पोहोचवण्यासाठी सर्वसामान्यांना परवडेल असं सॉफ्टवेअर तयार केलं आहे त्याचीही माहीती दाखवण्यात आली. 
कॉन्फरन्सचं उद्घाटन झाल्या दिवसापासून दिवसभर विविध ठीकाणी संशोधन पेपर्स्चं वाचन, विविध ऍप्लीकेशन्सचे डेमोज आणि पोस्टर प्रेझेंटेशन्स चालू होती. पाच दिवस नुसता सगळी्कडे ज्ञान यज्ञच चालू होता. जगभरातील संशोधकांचा आपण केलेल्या संशोधनाविषयी सांगण्यात, त्याची माहीती इतर तज्ज्ञ तसेच आमच्या सारख्या नवख्या व्यक्तींसमोर मांडण्यात कस लागत होता. विविध प्रश्न विचारले जात होते आणि त्यांची तेवढीच समर्पक उत्तरंही दिली जात होती. अशातच एका मोठ्या हॉल मध्ये विविध कंपन्यांनी आपापले स्टॉल्स प्रदर्शनासाठी लावलेले होते. यातच गुगल आणि याहू या दोन कंपन्यांनी तर सगळ्या तरूण संशोधकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी तीन दिवस विविध स्पर्धा ठेवल्या होत्या. त्या स्पर्धेतील विजेत्यांसाठीतेवढीच आकर्षक बक्षीसंही ठेवली होती. गुगलने दहा वेब लिंक्स दिल्या होत्या. स्पर्धकांनी आपला इ-मेल आयडी वापरून स्पर्धेत सहभागी व्हायचं. प्रत्येक लिंक साठी गुगल सर्च इंजीन वापरून कमीतकमी की-वर्डस किंवा वर्ड स्ट्रींग्ज वापरून ती वेब लिंक क्रमवारीत अर्वात वर आणण्याचा प्रयत्न करायचा. स्कोअर ४०० पासून चालू होत असे. सगळ्यात कमी स्कोअर ज्याचा होईल त्याला बक्षीस. या सगळ्याला फक्त सहा मिनीटे वेळ होता. तीनही दिवशी ३-४ लोकांमध्ये टाय ब्रेकर करायला लागलं. बक्षीस म्हणून आयपॅड देण्यात आला. एका दिवशी प्रत्येक स्पर्धक एकदाच खेळू शकत होता. पण आपल्या कडच्या हुशार स्पर्धकांनी गटागटाने, वेगवेगळे आय डी वापरून बरेच वेळा स्पर्धा खेळली. टाय ब्रेक मध्ये मात्र खूपच कस लागत होता. स्पर्धा खूपच इंटरेस्टींग आणि गुगल सर्च संदर्भात बरंच काही शिकवणरी होती. याहू कंपनीनेही स्पर्धकांना आक्र्षीत करून घेण्यासाठी ट्रेझर हंट सारखी स्पर्धा ठेवली होती. काही प्रश्न विचारले होते तर काही वस्तू आणून दाखवायच्या होत्या. या सगळ्यालाही नॅनो आयपॉड किंवा ख्रिस्तोस पापाडीमीट्रीयु (Christos H. Papadimitriou) या गणिततज्ज्ञाने लिहीलेलं न्यु यॉर्क टाईम्सचं प्रसिद्ध गणित तज्ज्ञ बर्नार्ड रसेल याच्या आयुष्यावर आणि पॅराडॉक्सवर आधारित बेस्ट सेलर नॉव्हेल "लॉजीकॉमिक्स" (ख्रिस्तोसच्या स्वाक्षरीसहित) ठेवलं होतं. मला सुद्धा लॉजीकॉमीक्सची एक प्रत बक्षीस म्हणून मिळाली. दुसर्‍या दिवशी म्हणजे ३१ मार्चला सर टिम बर्नर्स ली यांचं Designing the Web for an Open Society या विषयावर व्याख्यान झालं. त्यांच्या व्याख्यानात मुख्यत: वेब डीझाईन करताना आपल्या समाजासाठी ओपननेस (सर्वांसाठी मोफत उपल्ब्धता), न्याय, पार्दर्शकता, जबाबदारी, सहभाग, नविन संशोधन, त्यातील शास्त्र आणि लोकशाही ह्या फीचर्सना कसं आंतर्भूत करता येईल यावर विचार मांडले.  तिसर्‍या दिवशी ख्रिस्तोस पापाडीमीट्रीयु या अमेरिकेतील बर्कले विद्यापीठातील इकॉनॉमीस्ट आणि गणिततज्ज्ञाचं Games, Algorithms and Internet या विषयावर व्याख्यान झालं. ह्या प्रो ख्रिस्तोस यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते बिल गेट्स यांचे अंडर ग्रॅज्युएट लेव्ललला ऍडव्हायझर होते. एकोणच गणितातील सिद्धांतांचा व्यवहारात, इंटरनेटमध्ये आपण कुठेकुठे वापर करू शकतो येवढं जरी विद्यार्थ्यांना सांगीतलं गेलं तरी त्यांची गणितातील रूची तसेच समज वाढण्यास नक्कीच उपयोग होईल यात शंका नाही.
विविध डेमोज आणि पोस्टर्स बघणे, काही पेपर्स ऐकणे आणि स्पर्धां मध्ये सहभागी होणे यातच विविध देशांच्या संशोधकांशी ओळख झाली. त्यातच आपल्याकडे वर्ल्ड कप सेमी फायनलचा आणि भारत-पाकीस्तान लढतीचा दुहेरी फीव्हर असल्याने ३० तारखेला संध्याकाळी ५ नंतर आम्ही मोठ्या स्क्रीनवर कॉन्फरन्सच्याच ठीकाणी मॅच पहात बसलो होतो. बर्‍याच परदेशी लोकांना क्रीकेट म्हणजे काय हे सुद्धा माहीती नव्हते. त्यामुळे मॅच पाहता पाहताच कोलोनियल राजवटीचे प्रतिक पण आता भारतात एक धर्म म्हणून उदयाला आलेल्या क्रिकेटची माहीती सांगणे हे आमचं आद्यकर्तव्य समजोन ती माहीती सांगणे देखिल चालू होते. आम्हा गुगल फेलोशिप धारकांसाठी ३० तारखेला रात्री गुगल तर्फे हॉटेल नोव्होटेलच्या लॉनवर मोठी पार्टी ठेवली होती. पार्टीत विविध गिफ्टस बरोबरच अनेक कोडी सोडवण्यासाठी ठेवली होती. पण मॅचमुळे कुणाचच फारसं पार्टीत लक्ष नव्हतं. शेवटच्या दिवशी म्हणजे एक तारखेला आम्हा गुगल फेलोजना हॉटेल नोव्होटेलमध्ये दुपारच्या जेवणाचं आमंत्रण होतं. तिथे जेवता जेवता गुगल मधल्या संशोधकांशी गप्पा असाही बेत होता. तिथे गेल्यावर समजलं की आम्ही सात जणी सीलेक्ट झालेलो होतो. त्यात आम्ही दोघी भारतीय (एक आय आय टी कानपूरची मुलगी), एक तैवानची, एक उरूग्वेची, एक स्पेनची, एक इराणी पण अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिकणारी आणि एक श्रीलंकन पण अमेरिकेतील एम आय टी विद्यापीठात शिकणारी होती. त्या श्रीलंकन स्कॉलरशी बोलताना लक्षात आलं की ती सर टिम बर्नर्स ली यांची एकमेव पी एच डी स्टुडंट आहे आणि सीमॅन्टीक वेब टेक्नॉलॉजीचं स्टॅंडर्ड (प्रोटोकॉल) तयार करण्याचं काम करते आहे. कॉन्फरन्सच्या पाच दिवसांत असे विलक्षण चमकुन जाण्याचे प्रसंग बरेच आले. म्हणजे याहू चे सी ई ओ श्री राघवन यांच्याशी बोलणं, डीबीपीडीया, यागो यांसारख्या डेटाबेसेस लिहीणार्‍या संशोधकांच्या बाजूला बसणे (चुकुन), त्यांच्याशी संवाद-मार्गदर्शन, सर टिम बर्नर्स ली यांच्या बरोबर उभं राहून चहा घेणं, त्यांच्याशी बोलणं, गुगल मधल्या संशोधकांच्या बाजूला बसून जेवण घेणं, त्यांच्याशी त्यांच्या संशोधन विषयी आपल्या कल्पनांविषयी चर्चा करणं यासारखे अनुभव शब्दात नाही व्यक्त करता येत. त्यासाठी अनुभवच घेतला पाहीजे. एकूणच माझा मार्च मध्यापासूनचा कालावधी दोन कॉन्फरन्सेस ऍटेंड करण्यात गेला. दोन्ही मध्ये अमेरिकेतील एमआयटी विद्यापीठातील संशोधकांचं काम पाहण्याची आणि त्यांना ऐकण्याची संधी मिळाली. मोठा ज्ञान यज्ज्ञच चालू होता. अशी संधी खूप कमी वेळा मिळते. त्यासाठी माझ्या इन्स्टीट्युट आणि फेलोशिपचेच आभार मानायला हवेत.

Wednesday 23 March 2011

कथा!!


नेहमीप्रमाणे ससा आणि कासवाची शर्यत चालू होते. नेहमीप्रमाणेच ससा टिवल्या-बावल्या करत शर्यतीत पुढे पुढे पळत राहतो. वाटेत अनेक प्रलोभनांना बळी पडून मजा करत राहतो. कासव नेहमीप्रमाणेच हळूहळू पण स्थिर गतीने चालत पुढे पुढे सरकतं. वाटेत आलेल्या प्रलोभनांकडे जराही लक्ष न देता कासव शर्यतीच्या शेवटाकडे चालतच राहतं. या गोष्टीत ससा झोपत नाही पण मजा करत असतो. आणि शेवटी शर्यतीचा शेवटचा टप्पा दिसू लागताच, हळूहळू चालणार्‍या कासवाच्या डोक्यावर बसून शर्यत कासवाच्या आधीच पूर्ण करतो. १९८३ साली प्रदर्शित झालेल्या सई परांजपे दिगदर्शित "कथा" या चित्रपटाची ही सुरूवत. पूर्ण सिनेमा हा दोन मित्रांच्या गोष्टीवर आधारित आहे. गोष्ट घडते ती मुंबईतील एका सामान्य चाळीत. सई परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या काही उत्तम चित्रपटांपैकी एक चित्रपट असा याचा लओकीक नक्कीच आहे. सई परांजप्यांचं ससा-कासवाच्या कथेच्या रूपानं संपूर्ण चित्रपटाची कथा सुरूवातीलाच दाखवणं धोक्याचं असलं तरी खूप छान झालंय. म्हणजे त्यांनी या रूपकात्मक कथेचा अगदी पुरेपुर वापर करून घेतला आहे. राजाराम आपटे अतिशय सालस आणि सज्जन मुलगा असतो. ज्या दिवशी त्याला ऑफीसमध्ये कायम केलं जातं त्याच दिवशी त्याचा कॉलेज मधला वासू नावाचा एक मित्र त्याच्याकडे रहायला येतो. मग सुरू होते मुंबईतल्या चाळीतील धमाल. राजारामच्या शेजारीच एक संध्या सबनीस नावाची सुंदर मुलगी रहात असते की जिच्यावर राजारामचं खूप प्रेम असतं. पण ते प्रेम एकतर्फीच असतं कारण संध्याला राजाराम गरज लागली की हवा असतो पण लग्नासाठी तिला तो आवडत नाही करण त्याचं शामळू व्यक्तीमत्त्व. राजारामचा मित्र वासू आल्यापासून सगळ्यांवर छाप पाडतो. त्याच्या बोलघेवडेपणाचा तसेच इतरांची खोटी स्तुती करतानाच संध्या देखिल त्याच्यामध्ये गुंतत जाते. आता वासू संध्यात खरंच गुंततो की आणखी काही यासाठी "कथा" हा चित्रपट जरूर बघा. यु-ट्युब वर त्याच्या लिंक्स आहेत.
सई परांजप्यांनी यातून एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे की सध्याच्या कलियुगात चांगल्या आणि सचोटीने वागणार्‍या लोकांना कधीच जिंकता येत नाही पण हेच जर तुमच्या कडे बोलघेवडेपणा असेल, इतरांना फसवण्याचं काळीज असेल तर तुम्ही यशस्वी होतात. या चित्रपटाद्वारे ८० च्या दशकातील चाळवाल्या मुंबईचं दर्शन घडतं. त्यात सई परांजपे यांनी अगदी एका डबेवाल्याला सुद्धा घेतलं आहे. सकाळी थोडाच वेळ येणारे पाणी आणि पहाटे पहाटे दुधाच्या बाटलीतून दूधकेंद्रावरून दूध आणणे सगळं सगळं दाखवलंय. सिनेमा दिग्दर्शित करण्याची सई परांजपे यांचं कौशल्य अफलातूनच आहे. सई परांजपे यांचा या चित्रपटामागील हेतू जरी वरील ससा कासवाची गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा असला तरी मला वाटतं की यातून अनेक इतर बोध घेता येतील. माणसाने चांगलं असावं पण आपल्या चांगूलपणाचा कुणाला गैरफायदा घेऊ न देणे हे सुद्धा अत्यावश्यक आहे. यशस्वि होण्यासाठी अ‍ॅसर्टीव्ह असायला लागतं. त्यासाठी आपला चांगला स्वभाव बदलण्याची गरज नाही. नविन पीढीतील मुलांना हा चित्रपट माहीती असणं जरा अवघडच. पण एक जरूर पहावा असा चित्रपट. सुरूवातीलाच "कथा" ची यु-ट्युब ची भाग-१ ची लिंक दिली आहे. तिथुनच पुढे इतरही भाग सापडतील.

Sunday 20 March 2011

ऑपरेशन लिबीया (ऑपरेशन ऑईल) - अमेरिकेची पारंपारिक धूळफेक!!

आजच अमेरिकन आणि नाटो फौजांनी लिबीयावर "मानवी हक्क संरक्षणाचे" कारण दाखवून हल्ले चालू केलेत. पण Prof Michel Chossudovsky  प्रमाणे मलाही असंच वाटतंय की हे "ऑपरेशन लिबीया" नसून "ऑपरेशन ऑईल" आहे. असं वाटण्यासाठी भरपूर पुरावे उपल्ब्ध आहेत. अमेरिकादी पाश्चिमात्य देशांनी नेहमीप्रमाणेच (जसं ९० च्या दशकात युगोस्लाव्हियात केलं तसं) जगाच्या डोळ्यात धूळफेक करून लिबीयात गडाफी विरोधकांना सर्व प्रकारची मदत देऊ केली आणि त्याला आंतर्गत बंडखोरीचे स्वरूप देऊन, आता "मानवी हक्क संरक्षणाच्या" नावाखाली लिबियाचा (परिणामी लिबीयामधील तेल स्त्रोतांचा) घास घ्यायला सुरूवात केली आहे.
लिबीयाच्या सध्याच्या आक्रमणाचं विश्लेषण बघण्याआधी थोडी पार्श्चभूमी बघूयात. खालील पाय चार्ट मध्ये सर्व जगातील तेल साठ्यांचे टक्केवारीत प्रमाण दिलेले आहे. 
मध्य पूर्वेतील तेलसाठ्यांचं प्रमाण सर्वात अधिक म्हणजे ५६% आहे. त्या खालोखाल अफ्रिकन देशांमध्ये आहेत. एकूणच मुस्लीम देशांमध्ये (साउदी अरेबिया, इराक, इराण, कुवेत, युएई, कतार, येमेन, लिबीया, इजिप्त, नायजेरिया, अल्जेरिया, कझाकस्तान, अझरबाइजान, मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई इ.) जागतिक साठ्यांच्या तुलनेत सगळ्यात जास्त म्हणजे ६६.२ ते ७५.९% तेलाचे साठे आहेत. याआधी वेगवेगळ्या कारणांनी अमेरिकादी राष्ट्रांनी ७०% मुस्लीम देशांतील तेलसाठ्यांवर नियंत्रण ठेवलं आहे. आता उरलेत अफ्रिकेतील देश. या देशांमध्ये तेल साठ्यांबरोबरच नैसर्गिक वायू आणि युरेनिअम यांचे साठे सुद्धा प्रचंड प्रमाणात आहेत. खालील तक्ता अफ्रिकेतील तेल साठ्यांच्या प्रमाणाची माहीती देतो.
आता लिबीयाला टार्गेट करण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे तिथले तेल साठे आणि लिबीयाचं अफ्रिका खंडातील स्थान. शेजारील ट्युनिशीया आणि इजिप्त मध्ये झालेली क्रांती आणि लिबीयात घडवुन आणलेली बंडखोरी यात जमीन अस्मानाचा फरक आहे. लिबीया या देशाचा मुख्य आर्थिक स्त्रोत म्हणजे तिथले तेलसाठे की जे एकट्या अमेरिकेतील तेल साठ्यांच्या तुलनेत दुप्पट आहेत. लिबीया अफ्रिका खंडात एक महत्त्वाच्या स्थानावर आहे. शेजारील ट्युनिशीया आणि इजिप्त मध्ये नुकत्याच झालेल्या क्रांतीमुळे तिथून अमेरिकेला सढळ हाताने सहकार्य मिळू शकतं.एकदा का लिबीया हातात आला की अमेरिकादी देशांचा अफ्रिकेतील मुक्त वावर प्रशस्त होईल.
खाली अफ्रिकेचा नकाशा दिला आहे. त्यातील देशांची नावं पाहता एक लक्षात येतं की हे सगळे देश विकसनशील किंवा अविकसित या दोनच प्रकारात मोडतात. याचाच परिणाम असा की अफ्रिकेत एकूणच नैसर्गिक साधन संपत्ती विपुल प्रमाणात आहे. म्हणजेच विकासाच्या नावाखाली तिथल्या नैसर्गिक साधन सामुग्रीचं शोषण झालेलं नाही. अफ्रिकेतील जे देश विविध युरोपिय देशांच्या अधिपत्याखाली होते त्या देशांमध्ये (ज्या ठीकाणी नैसर्गिक साधन संपत्ती खूप आढळलेली नाही) आधीच विविध प्रकारचा अजैविक कचरा   डंप केलेला आहे की ज्यावर प्रक्रिया करता येणार नाही आणि ज्याच्या अस्तित्त्वामुळे केवळ पर्यावरणच नाही तर मनुष्य़ जीवनाला सुद्धा हानी पोहोचू शकते.  लिबीयाचे शेजारी देश चाड आणि सुदान हे अजुनही तेल साठे आणि नैसर्गिक वायू, युरेनिअम यांच्या दृष्टीने अतिशय योग्य असे आहेत. म्हणजे फारसा कुणी तिथे अजुन हात मारलेला नाही. आपण जर लिबीया, इजिप्त, ट्युनीशिया, चाड, सुदान यांचं अफ्रिकेतील स्थान बघितलं तर युरोपातील देशांशी जोडणार्‍या तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहिन्या या देशांतून भूमध्यसमुद्रामार्गे टाकता येतील की जे सगळ्या युरोपिय राष्ट्रांना सोयीचं आहे. जर अमेरिकन कंपन्यांनी तिथले तेल आणि नैसर्गिक वायूसाठे ताब्यात घेतले तर अमेरिकेला युरोपिय राष्ट्रांवर देखिल नियंत्रण ठेवायला मदत होईल. अफगाणीस्तानात तेल साठे नसतानाही अमेरिकेने जो खेळ खेळला तो केवळ कझाकस्तान वगैरे स्लाव्हिक पण इस्लामिक देशांमधुन भूमध्यसमुद्रापर्यंत तेलवाहिन्या टाकण्यासाठीच. तसेच अफगाणीस्तान आणि पाकीस्तानचं स्थान हे राजकीय दृष्ट्या खूपच स्ट्रॅटेजीक आहे. त्यामुळे साम्यवादी शक्ती चीन आणि रशिया यांना शह देता आला. आता याचे दुष्परीणाम इस्लामिक दहशतवाद वाढण्यात झाला....पण त्याची फिकीर अमेरिकेनं कधीच केलेली नाही. कारण स्वत:चं वर्च्यस्व टिकवण्यासाठी हे देश कोणत्याही थराला जाऊन राजकारण करतात. त्यात विकसित आणि विकसनशील देश भरडले गेले तरी यांना काही सोयरसूतक नाही.
लिबीयावरील कारवाई ही ठरवुन केलेली आहे. गेले कित्येक महिने अमेरिकन हवाई दल व नौदल लिबीयाच्या आसपास भूमध्य समुद्रात तळ ठोकून आहेत. त्यांनीच लिबीयामधील गडाफी विरोधक बंडखोरांना पैसा आणि हत्त्यारे पुरवली आहेत. ट्युनिशीया आणि इजिप्त मधील क्रांती लिबीयात सुद्धा पोहोचली असं भासवण्यात आलं. प्रत्यक्षात लिबीयातील बंडखोरांनी पूर्वीच्या राजाचा झेंडा दाखवायला सुरूवात केली तेव्हाच लक्षात येत होतं की ही बंडखोरी अमेरिका पुरस्कृत आहे ते. कदाचित ट्युनिशीया आणि इजिप्त मधील क्रांती हे याच "ऑपरेशन लिबीया (ऑपरेशन ऑईल) चाच एक भाग होत्या हे कालांतराने बाहेरही येईल. गडाफी पासून लिबीयातील जनतेच्या सुरक्षेसाठी अमेरिका लिबीयावर बॉम्ब फेक करणार हे काही समजत नाही. यातून लिबीयातील नागरीकांना सुरक्षीतता कशी मिळेल? गडाफीला खाली खेचल्यावर लिबीयाचं नेतृत्त्व कोणाकडे असेल? अमेरिकेने जर लिबीयात इराक आणि अफगाणीस्तान सारखी परिस्थीती निर्माण केली तर अमेरिकेला लिबीया सोडणं अवघड जाईल. मग पुन्हा इराक आणि अफगाणीस्तान मध्ये जशा फौजा ठेवल्या आहेत तशाच लिबीयात पण ठेवणार का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. आतापर्यंत जेवढी म्हणून युद्ध झाली ती सगळी या तेलामुळेच झाली आहेत. हे तेल अजुन किती देशांचा घास घेणार आहे कोण जाणे?





Wednesday 9 March 2011

उर्जावाद-धर्मवाद-दहशतवाद: एक अपशकुनी त्रिकोण!!

१८ व्या शतकातील यंत्रवादाची जागा १९ व्या शतकात साम्राज्यवाद आणि उर्जावादाने घेतली. या उर्जावादातीलच शह-काटशहाचं राजकारण करत २० व्या शतकात साम्राज्यवादी तसेच साम्यवादी शक्तींनी धर्मवादाचा भस्मासूर निर्माण केला. २१ व्या शतकाच्या अगदी तोंडाशीच या धर्मवादाने दहशतवादाला जन्माला घातलं. ह्या सगळ्या राजकारणाचा उलगडा आपल्याला लोकसत्ताचे नविन संपादक श्री गिरीश कुबेर यांच्या "हा तेल नावाचा इतिहास आहे", "एका तेलियाने" आणि "अधर्मयुद्ध" या ट्रायलॉजीमध्ये होतो. श्री गिरीश कुबेर यांची अभ्यासपूर्ण आणि वाचनीय अशी लेखन शैली आपल्याला त्या सगळ्या इतिहासात ओढत नेते आणि त्याचं वर्तमानात चालू असलेल्या घटनांशी असलेला सहसंबंध उलगडून दाखवते. सगळ्याच मानवताप्रेमी, देशप्रेमी, अभ्यासू वृत्तीच्या वाचकमित्रांकडे संग्राह्य असावीत अशी ही तीन पुस्तकं.

याच तीन पुस्तकांना पूरक अशी माहीती म्हणजे त्यावेळी अफगाणिस्तानात कशी परिस्थीती होती याची तपशीलवार माहीती आपल्याला श्रीमती प्रतिभा रानडे यांच्या "अफगाण डायरी काल आणि आज" या अभ्यासपूर्ण तसेच प्रत्यक्ष अनुभवसिद्ध पुस्तकातून होते. या पुस्तकातून आपल्याला तालीबान हा दुसर्‍या महायुद्धानंतर रशियाविरोधी शीत युद्धात अमेरिकेनेच निर्माण केलेला भस्मासूर असल्याचे स्पष्टीकरणही मिळते. मध्य-पूर्वेच्या देशांतील एकूणच इतिहास समजून त्यांच्या वर्तमानाशी अमेरिकादी पाश्चात्य देशच कसे कारणीभूत आहेत हे सुद्धा लक्षात येते. आवर्जून आपल्या संग्रही असावं असं अजुन एक पुस्तक.

जेव्हा धर्मवाद जन्माला आला त्याचाच एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे "पाकीस्तानची निर्मिती". मध्यपूर्वेकडील कोणत्याही मुस्लीम देशातील लोकांना विचारलं तर ते सर्वप्रथम आपण नक्की कोणत्या वंशाचे आहोत हे आणि मगच आपण मुस्लीम असल्याचे सांगतात. उदाहरणार्थ: अफगाणीस्तानातील लोक स्वत:ला अफगाणी म्हणवतात, इराण मधील लोक स्वत:ला इराणी म्हणवतात, इजिप्त मधली लोकं इजिप्शीअन आहेत असं म्हणवून घेतात. त्यामुळे त्यांचं अस्तित्त्व हे त्या त्या भौगोलिक भागाच्या पूर्व संस्कृतीशी अधिक जोडलं गेलेलं आहे. पाकीस्तानची निर्मितीच मुळात इस्लामच्या नावाखाली झाली आहे. ज्या भौगोलिक संस्कृतीशी (भारतीय) त्यांची खरी नाळ जोडलेली आहे त्याचा ते स्विकार करत नाहीत. त्यामुळे पाकिस्तान हे इस्लामिक धर्मांधता आणि अधुनिक प्रगती याच्या कात्रीत सापड्लं आहे. त्यामुळे याच धर्मांधतेने पाकीस्तानात अनेक दहशतवादी हल्ले होत आहेत, पाकीस्तानातील धर्मांध लोक जगात इतरत्र दहशतवाद पसरवत आहेत, दहशतवादी हल्ले करत आहेत. यामुळे पाकीस्तानातील सामान्य जनतेचे हाल होत आहेत. पण पाकीस्तान निर्मितीनंतर आत्तापर्यंत विविध राज्यकर्त्यांनी, लष्करशहांनी पाकीस्तानला स्वत:ची अशी ओळख देण्याचा प्रयत्न केला पण अजुनही पाकीस्तानची ओळख एक दहशतवादी देश, दहशतवाद्यांना मदत करणारा, दहशतवादी तयार करणारा देश अशीच निर्माण झाली आहे. या प्रगतीशील जगात एकूणच पाकीस्तानच्या स्वओळखीच्या मध्ये धर्मांधता, टोकाचं इस्लामिकरण येत आहे. जर पाकीस्तानने कट्टर धर्मवाद सोडला तर त्यांना स्वत:ची अशी ओळखच उरत नाही. श्रीमती प्रतिभा रानडे यांनी "पाकीस्तान अस्मितेच्या शोधात" आणि "फाळणी ते फाळणी" या दोन पुस्तकांतून छान मांडणी केली आहे. एकूणच जगाच्या पाठीवर सध्या जो काही अनागोंदी कारभार माजला आहे त्याचा इतिहासातील अनेक घटनांशी सुसंगती लागण्यासाठी, त्यांच्यातील सहसंबंध उलगडण्यासाठी, ही सहा पुस्तकं लागोपाठ वाचावीत.

Monday 28 February 2011

"अर्थ" संकल्प की निरर्थक आशा??


    पूर्वीपासून म्हणजे अगदी माझ्या लहानपणापासून मी बघत आले आहे की फेब्रुवारी महिन्याचा अंत म्हणजे सगळ्यांचे कान बातम्यांकडे टवकारलेले असत. पूर्वी टीव्हीचं प्रस्थ नसताना लोक रेडीओ भोवती कोंडाळं करत. टीव्ही आल्यावर रेडीओची जागा टीव्ही ने घेतली पण कोंडाळं तसंच राहीलं. आता तर केबल टीव्हीच्या क्रांतीने विविध वृत्तवाहिन्यांवर बातम्यांचा ओघ चालू असतो आणि लोकही विखुरलेपणाने आपल्याला हव्या त्या चॅनल मधून हवे ते पाहण्यात गर्क असतात. सुरूवातीला समजायचंच नाही की येवढं त्या अर्थसंकल्पामध्ये काय असतं? नंतर नंतरच्या काळात हे महाग, ते स्वस्त अशा बातम्या वाचल्यावर थोडं थोडं डोक्यात शिरायला लागलं. स्वत:ची जेव्हा इन्कमटॅक्स रीटर्न भरायची वेळ आली त्यावेळी यातील खरी मेख समजायला सुरूवात झाली. नेमेची येतो मग पावसाळा या उक्ती प्रमाणे नेमेची येतो हा "अर्थसंकल्प" निरर्थक आशा घेऊन असं म्हणावं लगतं. मला नेहमी पडणारा एक प्रश्न आहेच. जर वर्षभर सर्वच चीजवस्तुंची, जीवनावश्यक वस्तुंची भाववाढ होत असते आणि त्याने महागाई वाढत असतेच तर २८ फेब्रुवारीच्या दिवशी मांडल्या जाणार्‍या ’अर्थ’ संकल्पाला काय अर्थ? 
     अगदी अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये बघीतली तरी लक्षात येतं की यांनी काय सुधारणा (??) केल्या ते. या आधीपर्यंत महिलांच्या करमुक्त वार्षिक उत्त्पन्नाची मर्यादा ही सर्वसाधारण करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त असे. त्याचा फायदा जर एखाद्या घरात स्त्रिया नोकरी करत असतील तर त्यांना आहेच पण याचा फायदा बायकोच्या नाववर, मुलींच्या नावावर आपल्या धंद्यातील काही हिस्सा चालवणार्‍यांना अधिक. आता ज्येष्ठ नागरिक आणि अति ज्येष्ठनागरिकांच्या प्राप्तीकराच्या करमर्यादेकडे बघितलं की हाच प्रश्न पडतो. कोणत्या पेन्शन घेणार्‍या ज्येष्ठ नागरिकाचं पेन्शन मधुन मिळणारं उत्पन्न (मी सर्वसामान्य लोकांबद्धल बोलत आहे) २ लाख पन्नास हजारांवर जाण्याची शक्यता आहे? त्यावर अजुन एक कडी म्हणजे कोणते अति ज्येष्ठ नागरिक (वय वर्षे ८० च्या पुढचे) त्यांचं वार्षिक उत्पन्न ५ लाखांच्या घरात कमावण्यासाठी बाहेर पडणार आहेत? हे सगळे दाखवायचे दात आहेत. या सगळ्या वाढीव करमर्यांदांचा फायदा सामान्य माणसाला शून्य आहे. ज्यांचे बिझनेस आहेत त्या लोकांना स्वत:च्या घरातील ८० वर्षांवरील तसेच ६० वर्षांवरील लोकांच्या नवावर तसेच महिलांच्या नावावर बिझनेसचा हिस्सा ठेवून त्यावर पैसा मिळवुन कर माफी घेता येईल. म्हणजे जर घरात २ व्यक्ती ८० वर्षां वरील आणि दोन व्यक्ती ६0 वर्षां वरील असतील आणि १-२ महिला(मुली) असतील तर यांचे आरामात वर्षाला १८,६०,००० रूपयांचे उत्पन्न करमुक्त होईल. प्रत्यक्षात त्या व्यक्तींच्या नावाने बिझनेस चालवायचा आणि सिग्नेचर अ‍ॅथॉरीटी स्वत:कडे ठेवली की एकाच बिझनेसचे ५-६ भाग करून तो बिझनेस चालवायला हे लोक मोकळे. :-) म्हणजे एखाद्याचा वार्षिक बिझनेस हा २०,००,००० रूपयांच्या आसपास असेल आणि त्या व्यक्तीकडे जर अशा विविध वयोगटातील व्यक्ती उपल्ब्ध असतील तर त्या व्यक्तीला आरामात करचुकवेगिरी करता येईल. ज्यांच्याकडे स्वत:चे पेट्रोलपंप असतात (पेट्रोलपंपावर सहजा सहजी प्रत्येक पेट्रिल विक्रीची पावती देत नाहीत), ज्यांची किराणामालासकट इतर वस्तुंची होम अ‍ॅप्लायन्सेसची दुकानं असतात त्यांना तर फारसं कधी कर भरायला लागतच नसेल असं वाटतं. हक्काचे कर भरणारे (म्हणजे कर महिन्याच्या महिन्याला पगारातून आपोआप कट होणारे) लोक म्हणजे नोकरदार वर्ग. यासगळ्यांची अगदी मुकी बिचारी .........सारखी अवस्था असते. 
    आता मोबाईलच्या आणि सिमेंट स्वस्त करून पण लोखंड महाग करून बांधकाम क्षेत्रातील जमीनींच्या किंमती तसेच त्यातील भ्रष्टाचार कसा कमी होणार? नुसतं सिमेंट स्वस्त होऊन उपयोग काय? लोखंड महाग असेल तर बांधकामाचे भाव खाली कसे येणार? मोबाईल आणि दागिने ह्या काही जीवनावश्यक वस्तु नाहीत. आजच एक मजेशीर लेख वाचण्यात आला. एका संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले की भारतात सर्वसामान्यांमध्ये मोबाईलचा वापर करणार्‍यांची संख्या ही टॉयलेटचा वापर करणार्‍या लोकांच्या तुलनेत प्रचंड मोठी आहे. दूरसंचार क्षेत्रातील स्कॅम मुळे मोबईलच्या वापरातील लोकप्रियता वाढली आहे तसेच असे स्कॅम्स निर्माण करून लोकांचा एखाद्या विषयासाठीचा अवेअरनेस वाढवायचा हा एक प्लॅन आहे असं लेखकाचं म्हणणं होतं. त्यामुळे अशा स्कॅम्स मुळे शासकिय तिजोरीचे नुकसान होत नसून अप्रत्यक्षपणे शासनाच्या धोरणांचा आणि योजनांचा फायदाच होतो आहे. त्यामुळे टॉयलेट वापराचा अवेअरनेस लोकांमध्ये पोचवण्यासाठी एका टॉयलेट स्कॅमची आवश्यकता आहे असा निष्कर्ष लेखकाने काढला आहे. मजेचा भाग सोडून दिला तर या मोबाईलच्या अतिप्रसाराची आणि या असल्या लॉजीकची एक प्रकारची भितीच वाटते. उद्या लोक काय सिमेंट आणि मोबाईल खायला सुरूवात करणार आहेत का? शेतकर्‍यांना जरी ४% दराने कर्ज देण्याचं आश्वासन असलं तरी त्यांच्या शेतीसाठी लागणारं पाणी आणि वीज यांची व्यवस्था काय? खतं जर नीकृष्ट दर्जाची वाटली जात असतील तर खतांचे भाव कमी करून काय फायदा? संरक्षणासंबंधी खर्चाची तरतूद वाढवली आहे पण आवश्यक शस्त्र आणि संरक्षण सामुग्रीच्या खरेदीमधील भ्रष्टाचाराला आळा कोण घालणार?
   एकट्या आय आय टी खरगपूरला एक रकमी ४०० कोटी रूपये देणे, अलिगढ मुस्लीम विद्यापीठाला ५० कोटी रूपये हा काय प्रकार आहे? याने उच्च शिक्षणातील वाढत्या शुल्काच्या समस्येला कसा काय आळा बसेल? या दोन विद्यापीठांनाच येवढी घसघशीत मदत करण्यामागचं कारण काय असेल? सूज्ञलोकांना बरोबर समजते. अलिगढ विद्यापीठ हे मुस्लीम विद्यापीठ आहे आणि आय आय टी खरगपूर ही प. बंगाल मधील शैक्षणिक संस्था आहे. म्हणजे काल जसं ममता दिदिंनी प. बंगालला रेल्वे अर्थ संकल्पात नेहमीप्रमाणे झुकतं माप दिलं होतं त्याप्रमाणेच प्रणवदांनी मुस्लीम आणि बंगाल यांना झुकतं माप दिलंय.  आपण पुन्हा सतेवर येऊ की नाही ही शंका असल्याने बंगाल मधील विद्यापीठाल ४०० कोटीचं रोख अनुदान आणि मुस्लीम विद्यापीठाला ५० कोटींचं अनुदान देऊन प्रणवदांनी कॉंग्रेसच्या व्होट बॅंकेला खुष करण्याचा प्रयत्न केला आहे. या असल्या घोषणांवर कारवाई कोण करणार? मोफत आणि सक्तीच्या अशा प्राथमिक शिक्षणासाठी २१ हजार कोटी रूपये दिले आहेत पण ठोस उपाय आहेत का? त्यांची योग्यअशी भ्रष्टाचार विरहित अंमलबजावणी करणारे लोक आहेत का? सगळी नुसती धुळफेक आहे. या असल्या ’अर्थ’संकल्पातून निर्थक आशाच फक्त हाती येते बाकी कहीही नाही.